विशिष्ट भागातील घरे, दुकाने, प्रार्थना स्थळांवर दगडफेक, हातगाड्यांसह दुचाकींची तोडफोड, पोलिसांकडून लाठीमार
प्रतिनिधी / कोल्हापूर
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने विशिष्ट भागातील घरे, दुकाने आणि प्रार्थनास्थळांवर तुफान दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या बाजुनेही दगडफेक आणि काचेच्या वस्तू फेकण्यात आल्या. यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. हातगाडे व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण तणाव कायम होता. दरम्यान तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. झालेल्या नुकसानीचीही दखल घेऊन प्रशासनाकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कोल्हापूर शहरातील 5 तरुणांनी मोबाईल स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडिओ लावण्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. त्या तरुणांवर कारवाई व्हावी, यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरात बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्व बाजारपेठातील व्यवहार ठप्प होता. एसटी, केएमटीसह रिक्षा वाहतूक बंद होती. बंदच्या आवाहनासह प्रतिसाद देत बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. सोशल मीडियावर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यावर कार्यकर्ते आक्रमक होते. वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या त्या तरुणांवरील कारवाईवरून कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या मारला. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. तसेच चुकीच्या पोस्ट व्हायरल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडा साळुंखे, भाजपचे महेश जाधव, अशोक देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन करण्याचा संयम बाळगण्याचे आवाहन केले. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जमावबंदीचा आदेश असल्याने गर्दी करता येत नसल्याचे पोलीसांनी संगितले. पण कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत संशयितांवर कारवाईची मागणी केली.
घर, दुकान, प्रार्थनास्थळांवर दगडफेक
छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांत सहभागी होण्यासाठी अन्य कार्यकर्ते येत होते. कार्यकर्ते गटागटाने शहरातील विविध भागात हातात झेंडे आणि घोषणा देत फिरू लागले. त्यांनी महापालिका चौक, लुगडी ओळ, गंजी गल्ली, बिंदू चौक, पानलाईन, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, मटण मार्केट परिसर, मिरजकर तिगडी ते बिंदू चौक येथे काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक सुरू केली. यावेळी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. महापालिका चौकात हातगाड्या उलटविण्यात आल्या. गंजी गल्ली येथे काही घरांवर दगडफेक झाली. शिवाजी रोडवरील आराम कॉर्नरजवळ फळांच्या गाड्या उलटवून टाकण्यात आल्या. राजाराम रोडवरील बिंदू चौक, सबजेलच्या परिसरात स्पाटर्न क्लबजवळील जमावाने दगडफेक केली. रिक्षाच्या काचा फोडल्या. या परिसरातील लोकांनी जमावावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तंग बनले. मात्र याचवेळी पोलीस आल्यामुळे स्थिती निवळली.
दगफेकीच्या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहणी केली. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे लक्ष आहे. कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे, शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या पाच संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरबाजार येथील गवळ गल्ली, माळवाडी, वडणगे आणि सदरबाजार येथील शेख गल्ली येथील संशयित तरुण आहेत. दोघेही अल्पवयीन आहेत. पराग रत्नाकर फडणीस यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित
कोल्हापूर शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून लोक सुरक्षेसाठी दूरसंचार सेवा (इंटरनेट) तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्याबाबतचे नियम, 2017 अन्वये जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 8 जून रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 31 तासांच्या कालावधीकरिता इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी दिली आहे.