आसाम सरकारची कारवाई, दहशतवादाची पाळेमुळे उखडणार
@ गुवाहाटी / वृत्तसंस्था
अल् कायदा या जागतिक इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने आसाम राज्यात एक मदरसा राज्य सरकारच्या कारवाई अंतर्गत पाडविण्यात आली आहे. यापूर्वीही याच कारणास्तव दोन मदरसा पाडविण्यात आल्या होत्या. मदरसा पाडविण्यासाठी 8 बुलडोझर्सचा उपयोग करण्यात आला.
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गेल्या शुक्रवारी याच मदरसाच्या एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून अनेक प्रकरणांवर प्रकाश पडणार आहे. या शिक्षकाचे नाव मुफ्ती आफिझ उर् रहमान असे असून काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. त्याच्या घरात अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि प्रक्षोभक लिखाण असणारे कागद मिळाले होते. रहमान याला त्याचवेळी कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
तिसरा मदरसा
गेल्या दोन महिन्यांमध्ये आसाममध्ये सरकारकडून पाडविण्यात आलेला हा तिसरा मदरसा आहे. या मदरशांच्या व्यवस्थापनाजवळ कोणतेही कायदेशीर प्रमाणपत्र किंवा अनुमतीपत्र नाही. या मदरशांमधून धर्मांधतेचे शिक्षण दिले जात होते. तसेच तरुणांच्या मनात प्रक्षोभ निर्माण करून समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न केला जात होता, असे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.
अनेक कारनामे
या मदरशांमध्ये अनेक देशविरोधी कृत्ये चालत होती, असाही आरोप होता. या मदरशांच्या अनेक इमारती एकाच परिसरात आहेत. या इमारतींमधून देशविरोधी कारवाया चालतात, असा आरोप काँगेसच्या कार्यकाळातही झाला होता. मात्र, राज्यात आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांमध्ये वाद असल्याने कारवाई होत नव्हती. त्यामुळे ही कठोर कारवाई करावी लागली, अशी भूमिका आसाम सरकारच्यावतीने घेण्यात आली आहे. आणखी काही मदरसे व मशिदींवर सरकार बारकाईने नजर ठेवून आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव दहशतवादाला अनुकूल वातावरण निर्माण होऊ न देणे, हे राज्य सरकारचे उत्तरदायित्व आहे, अशी टिप्पणी आसामच्या राज्य सरकारकडूनच करण्यात आली आहे.
आणखी किती प्रार्थनास्थळे
आसामसह देशभरात अल् कायदा आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशभरात 10 हजारांहून अधिक मदरशांमध्ये कट्टर धार्मिक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते, अशा तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत. तथापि, आसाम आणि इतर भाजपप्रणित राज्यांनी अल् कायदाची पाळेमुळे उखडून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारची भूमिकाही अशीच आहे.