Kolhapur News : कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून काल दगडफेक झाली. आज सकाळपासूनच कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. संगमनेर आणि कोल्हापुरात घडलेल्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी पक्ष हे मुद्दाम घडवून आणत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर कोल्हापुरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील एका राजकीय नेत्याने केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.यामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजप नेते ,आमदार अतुल भातखळकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधी पक्षातील एका राजकीय नेत्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्टेटस ठेवणाऱ्यांनाच फक्त अटक करून चालणार नाही. तर अशा पध्दतीने जे वक्तव्य करत आहेत त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.ही हिंदुत्ववादी संघटनेची भूमिका असल्याचं महाडिक यांनी आज माध्यमांना प्रतीक्रिया देताना म्हटलं आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक
औरंगजेब आणि टिपू सुलतान हे कधीच आपले दैवत होऊ शकत नाहीत. महाराष्ट्राचे दैवत एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे. अशाप्रकारे स्टेटस ठेवून हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम करण्यात आलंय. भावना भडकल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटली आहे.स्टेटस ठेवणाऱ्या मुलांना अटक केली आहे. मात्र त्याच्या मागे कोण आहे याचा तपास करायला हवा. कोल्हापुरात काही दिवसात जातीय दंगली घडतील अस वक्तव्य काही दिवसापूर्वी एका नेत्याने केले हे त्यांना त्यावेळी कसं कळालं असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोल्हापुरात असे प्रकार कधीच घडले नाहीत. लव्ह जिहादची दोन प्रकरणे घडली.स्टेटस ठेवणाऱ्यांनाच फक्त अटक करून चालणार नाही. तर अशा पध्दतीने जे वक्तव्य करत आहेत त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.ही हिंदुत्ववादी संघटनेची भूमिका आहे.या तरुणांच्या मागे धनी कोण आहे त्यांची चौकशी करा अशी मागणी संघटनेची आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांशी माझ बोलणं झालं आहे.या गर्दीला चेहरा नाही.विरोधी पक्ष म्हणतो सत्ताधारी पक्ष हे मुद्दाम घडवून आणत आहे.जे पकडले गेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत का? हे कुणाचे कार्यकर्ते आहेत? त्यांचे नेते कोण आहेत? याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
राज्यसरकार लक्ष ठेवून आहे- भाजप नेते ,आमदार अतुल भातखळकर
कोल्हापुरातील परिस्थीतीवर बोलताना भातखळकर म्हणाले की, जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.म्हणूनच एका राजकीय पक्षाचे आमदार बोलले होते की, पुढील वर्ष दंगलीचे असणार. हे त्यांना कस कळलं असा सवालही त्यांना केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यसरकार यावर लक्ष ठेवून आहे. त्याला पायबंद घालतील.येणाऱ्या काळात यामागे कोणती शक्ती आहे.खरे चेहरे कोण आहेत ते बेनकाब करण्याचे काम राज्यसरकार, गृहखाते करील असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षातील लोक जाणीवपूर्वक… ; माजी आमदार राजेश क्षीरसागर काय म्हणाले
तीन महिन्यापूर्वी राजकीय पक्षाच्या एका व्यक्तीनं दंगली होतील अस भाकित केलं होतं.त्यामुळे विरोधी पक्षातील लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत अस म्हणण चूकीचं ठरणार नाही असे राजेश क्षीरसागर प्रतिक्रिया देताना म्हणाले.