वार्ताहर / कुद्रेमानी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व दौलत साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी कुद्रेमानी गावातील शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी वेळेत सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
गावातील शेतकरी गोपाळ चौगुले यांच्या मळ्यातील ऊस तोडणी गुरूवारी स्थानिक ऊस तोडणी कामगारांकडून पहिल्यांदा सुरू करण्यात आली. यावेळी ऊस मळ्याचे मालक गोपाळ चौगुले, सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील, उसवाहतूकदार नाना पाटील, ऊस तोडणी टोळीप्रमुख रमेश देवण यांच्याहस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले व ऊस तोडणीची सुरुवात करण्यात आली.
यंदा पावसाळा जास्त नसला तरी अल्पप्रमाणात झालेल्या पावसाने गाव परिसरात शेतवाडीतील रस्ते खराब झाले आहेत. तिथे ऊसाची वाहतूक करणे अवघड आहे. तसेच माळरानातील भात, रताळी, नाचणा, भूईमुग इत्यादी पिकांची सुगी अद्याप सुरू नाही. त्यामुळे ऊसमळ्यापर्यंत पोहोचणे अडचणीचे आहे. अशा ठिकाणी ऊसतोडणी वेळेत करणे अडचणीचे आहे. त्यामुळे विलंब होईल पण गावातील सर्व शेतकऱ्यांचे ऊस वेळेत तोडणी करून त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मत ऊस तोडणी कामगारांकडून व्यक्त करण्यात आले.