विवाह करण्यासाठी उपनोंदणी कार्यालयात आलेल्या तरुणाचे पलायन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उडाला गोंधळ
बेळगाव : प्रेम झाले, नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी दोघेही आले. याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी आणि आईदेखील उपस्थित होती. मात्र प्रियकराने अचानक धूम ठोकल्याने प्रेयसीच्या पायाखालची वाळूच घसरली. तिने चक्क आरडाओरडा सुरू केला. तो दुचाकी घेऊन पळाला. त्याच्या पाठोपाठ तिही पळाली. नेमके काय घडले? हेच कोणाला समजले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेने काहीवेळ एकच गोंधळ उडाला. मात्र हे प्रेम प्रकरण असल्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रेम झाले त्यानंतर विवाह करण्यासाठी उपनोंदणी कार्यालयाकडे प्रियकर आणि प्रेयसी आली. दोघेही आंतरजातीय होते. प्रेयसी उपनोंदणी कार्यालयात होती. त्यावेळी प्रियकर अचानक बाहेर पडला. त्यानंतर त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेली दुचाकी सुरू केली आणि त्याने तेथून पळ काढला. प्रियकराला अडविण्यासाठी प्रेयसीही त्याच्या पाठीमागून धावली. मात्र तोपर्यंत त्याने बराच पल्ला गाठला होता.
सदर तरुणीने आरडाओरडा केला. साऱ्यांना वाटले की पैशाची बॅग किंवा दुचाकी पळविली आहे. मात्र पोलिसांनी तिला विचारले असता आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आलो होतो. मात्र त्याने पलायन केले आहे, असे सांगितले. तत्पूर्वी काहीजणांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सदर तरुणीची आईदेखील न्यायालयात उपस्थित होती. तिला बोलावून घेऊन त्यानंतर त्यांनी चर्चा केली होती. फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. अलीकडे तरुण आणि तरुणी घरात कोणतीच माहिती न देता नोंदणी पद्धतीने विवाह करत आहेत. विवाह करून दीड-दोन वर्षे उलटल्यानंतर त्याची माहिती घरातील सदस्यांना दिली जाते. काहीजण विरोध केल्यानंतर पळ काढत आहेत. त्यामुळे नोंदणी पद्धतीने केलेले विवाह थेट न्यायालयात पोहोचत आहेत. त्याठिकाणी घटस्फोटासाठी अर्ज घातले जात आहेत. असे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी तर चक्क उपनोंदणी कार्यालयातूनच प्रियकराने धूम ठोकल्याने याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. एकूणच असे प्रकार समाजाला घातक असल्याचेदेखील बोलले जात होते.