पणजी प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल विश्व सागरी भारत परिषद 2023चे केंद्र मुंबईतील एमएमआरडीए मैदानाला भेट देऊन परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. भारत सरकारच्या बंदर, जहाजोद्योग व जलवाहतूक मंत्रालयातर्फे या परिषदेचे आयोजन होणार आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर या भव्य परिषदेची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काल त्यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणचे चेअरमन राजीव जलोटा, आएएस आणि अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एकूण तयारींचा घेतला.
17 ते 19 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत 70 पेक्षा अधिक देश सहभागी होणार असून 40 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आणि 50 पेक्षा अधिक राष्ट्रीय वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या वर्षातील समुद्री क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम मानल्या जाणाऱ्या या परिषदेत 150 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रदर्शक सहभागी होतील.
तीन दिवस होणाऱ्या या परिषदेला 50 हजारपेक्षा पाहुणे भेट देईल, असा अंदाज असून 400 पेक्षाअधिक परदेशी गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींचा या परिषदेत सहभाग अपेक्षित आहे.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दक्षिण आशियातील सर्वांत भव्य गणल्या जाणाऱ्या ‘ईनमॅक्स‘ प्रदर्शनानिमित्त मुंबई ऍग्जिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमाला श्री. नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने ते उपस्थित होत.
पुण्यातील कार्यक्रमात सहभाग
आज दि. 7 ऑक्टोबरला पुण्यात झालेल्या विश्व समुद्री सप्ताह सोहळा व मर्चंट नेव्ही जागृती मार्च पास्ट या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी उपस्थिती लावली. सागरी क्षेत्राशी निगडित दोन दिवसांतील तिसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाला श्री. नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
देशाच्या अर्थकारणात बंदर, जहाजोद्योग आणि जलवाहतूक मंत्रालय महत्वाची भूमिका बजावत आहे. 7500 कि.मी.ची किनारपट्टी लाभलेल्या भारत देशाला सागरी क्षेत्रात विकास साधण्यासाठी मोठी संधी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर, जहाजोद्योग व जलवाहतूक मंत्रालय वेगवेगळ्या संधी विकसित करीत आहेत.