चापगाव येथील कोपरा सभेत अॅड. ईश्वर घाडी यांचे आवाहन : सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर /नंदगड
माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात खानापूर तालुक्याचा विकास केला. काँग्रेस पक्षाची संघटना बळकट केली. त्यांचे नेतृत्व, विकासाभिमुख काम पाहून काँग्रेस पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी बहाल केली आहे. खानापूर तालुक्यातील जनतेने खानापूरचा खासदार बनवण्यासाठी अंजली निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन चापगाव येथे काँग्रेस पक्षाच्या कोपरा सभेत अॅड. ईश्वर घाडी बोलताना केले. उमेदवार अंजली निंबाळकर म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीतील चुकीची पुनरावृत्ती करू नका. धर्म आणि स्वत:च्या नेत्याच्या नावावर मते मागणाऱ्यांकडे आधी तीस वर्षाचा हिशेब विचारा. नळाला पाणी, घरासमोरचा रस्ता, गावची शाळा यांच्या विकासासाठी काँग्रेसच काम करू शकते. भाजपचे नेते मोदींच्या नावावर मते मागतात. ही त्यांच्या अपयशाची साक्ष आहे. भाजपचे शेतकरी प्रेम बेगडी आहे. आज दुष्काळात शेतकरी व मजुरांचे जगणे कठीण झालेले असताना कष्टकऱ्यांना दिलासा देणारी रोहयो योजना काँग्रेसची देणगी आहे. हे कुणीही विसरू नये. ता. पं. माजी सदस्य महादेव घाडी म्हणाले, गृहलक्ष्मीसारखी महिलांना स्वावलंबी बनवणारी योजना लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. अंजली निंबाळकर यांना संधी दिल्यास मलप्रभा नदीवर जागोजागी बंधारे उभारून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील. त्याकरिता पाच वर्षातून एकदा तोंड दाखविणाऱ्यांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन केले. यावेळी कार्यकर्ते सावित्री मादार, महादेव कोळी, वैष्णवी पाटील, जोतिबा शिवणगेकर, प्रसाद पाटील, आदींसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.