दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी पूर, : झाडे जमिनदोस्त, दरडी कोसळल्या,एक दिवसात 6 इंच पाऊस नोंद,प्रशासन यंत्रणेला सज्जतेचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
पावसाने काल मंगळवारी सलग दुसऱया दिवशीही राज्याला झोडपून काढल्याने राज्यातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वत्र पूरसदृष्यस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या मौसमातील एका दिवसात सर्वाधिक 6 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद पाच वर्षानंतर प्रथमच काल मंगळवारी 5 जुलै रोजी झाली. हवामान खात्याने 9 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर नारंगी अलर्ट जारी केला आहे. सोमवारी राज्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक 8.50 इंच विक्रमी पावसाची नोंद सांगे येथे झालेली आहे. अद्याप मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.
धारबांदोडा, सांगे, केपे येथील नद्यांना पूर येऊन पाणी रस्त्यावर पोहोचले आहे. अनेकांना धोका संभवत असल्याने सायंकाळपासून अनेकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे कार्य सुरु झाले आहे. सत्तरीत म्हदाई नदीचे पाणी वाढत असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
पावसाने सलग दुसऱया दिवशीही ‘रेकॉर्ड ब्रेक’ कोसळणे सुरूच ठेवले आहे. सोमवारी पहाटे सुरू झालेला हा पाऊस दिवसभर कोसळत राहिला. त्यानंतर सायंकाळी थोडा कमी होऊन रात्री उशिरा पुन्हा मुसळधार सुरू झाला. मंगळवारीही दिवसभर पावसाने झोडपून काढले. एका दिवसात 6 इंच पेक्षाही जास्त पाऊस कोसण्याचा प्रकार यापूर्वी 3 जुलै 2013 मध्ये घडला होता. तब्बल 9 वर्षानंतरचा हा पावसाचा एक रेकॉर्ड आहे.
पावसाच्या यापुर्वीच्या विक्रमी नोंदी
2013 मध्ये 163 मि. मी. म्हणजेच 6.5 इंच पाऊस पडला होता तर यावेळी 156 मि. मी. एवढा पडला आहे. 2009 मध्ये कहर म्हणजे 211 मि. मी. अर्थात 8.50 इंच सरासरी एवढा मुसळधार पाऊस पडला होता. त्याच्याही पलिकडे गेल्यास 25 जुलै 2007 मध्ये 225 मि. मी. म्हणजे जवळपास 9 इंच सरासरी पावसाची नोंद झाली होती. 24 जुलै 1998 मध्ये 287 मि. मी. म्हणजे तब्बल 11 इंच पावसाची गोव्यात सरासरी नोंद झाली होती. 15 जून 1996 मध्ये 292 मि. मी. म्हणजेच जवळपास 12 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद एका दिवशी झाली होती.
या वर्षी राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद सांखळी येथे झाल्याचे दर्शविते. वाळपई नंतर सर्वाधिक पाऊस पडणाऱया या केंद्रावर पावसाची नोंदणी यावर्षी कमी दर्शवितेय. कदाचित नोंद करताना काही त्रुटी राहिल्या असतील.
शनिवारपर्यंत मुसळधार
हवामान खात्याने शनिवार 9 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर ऑरेंज अलर्टही जाहीर केलेला आहे. मंगळवारी पावसाने तुफान फटकेबाजी लावतानाच सर्वत्र पूरसदृष्य स्थिती निर्माण केली. सायंकाळी मात्र पावसाने थोडीफार उसंत घेतली. मात्र या पावसाचा भरोसा नाही.
पाऊस पोहोचला अर्धशतकावर
जुलैमध्ये वार्षिकच मुसळधार पाऊस कोसळत असतो. गेल्या 24 तासात सरासरी 6 इंच पावसाची विक्रमी नोंद झाल्याने 48 इंचाची सरासरी नोंदणी पार केली. त्यात मंगळवारी सकाळपासून पडलेल्या पावसाची नोंद नाही. त्यामुळे राज्यात सरासरी 5 जुलैपर्यंत पावसाने इंचाचे अर्धशतक गाठले आहे. साधारणतः आजच्या घडीला सरासरी 42 इंच पाऊस होत असायचा. यंदा तो 8 इंचानी पुढे आहे. हा विक्रम गेल्या दोन दिवसात कोसळणाऱया पावसाने झाला आहे. उत्तर गोव्याच्या तुलनेत यावर्षी दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. पाऊस अर्धशतकावर येऊन ठेपला आहे.
यंदा पावसाने कहर केल्याचे दृष्टीस येते. आगामी 24 तासात जोरदार वादळी वाऱयासह गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला. त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अनेक झाडे जमिनदोस्त
जोरदार पाऊस व वादळी वाऱयाने गोव्यात गेल्या तीन दिवसात असंख्य झाडे कोसळली. अग्निशामक दलाच्या जवानांना सातत्याने फोन कॉल्स येत असतात. या दलातील जवानांची सातत्याने धावाधाव सुरू झाली आहे. रात्री अपरात्री देखील अनेक ठिकाणी झाडे पडल्याचे फोन येत आहेत.
गेल्या 24 तासांतील गोव्यात पडलेला पाऊस
- ठिकाण इंच
- म्हापसा 7.75
- पेडणे 6.08
- फोंडा 5.00
- पणजी 5.00
- जुने गोवे 7.00
- सांखळी 5.50
- वाळपई 6.50
- काणकोण 5.50
- दाबोळी 6.00
- मडगाव 5.75
- मुरगाव 5.00
- केपे 6.00
- सांगे 8.50
दावकोण, धुलैय गावें धोक्यात
आठ कुटुंबाचे स्थलांतर : गावातील रस्ता पाण्याखाली : घरांपर्यंत पोचले पाणी
धारबांदोडा पंचायतक्षेत्रातील दावकोण गावातून वाहणाऱया दूधसागर नदीची पातळी वाढल्याने दावकोण व शेजारील धुलैय गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारनंतर दावकोण गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच या गावातील आठ घरांच्या अंगणापर्यंत पाणी पोचले होते. पाण्याची पातळी वाढल्यास दोन्ही गावातील लोकांना सुरक्षित जागी हलविण्याची तयारी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने ठेवली आहे.
धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, मामलेदार प्रवीणजय पंडित हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नदीचा प्रवाह वाढल्यास गावातील लोकांना दुसऱया जागी हलविण्यासाठी नदी परिवहन खात्याच्या होडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र रात्री 8 वा. नंतर पावसाने विसावा घेतल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारी यंत्रणानी सांगितले.
धुलैय गावातील चार घरांच्या अंगणापर्यंत पाणी पोचले होते. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून दावकोण गावातील आठ घरातील लोकांना दुसऱया जागी हलविण्यात आले आहे. पुराचे पाणी वाढल्यास कळसई दाभाळ येथील इमेक्युलेश कन्सेप्शन हायस्कूलमध्ये लोकांना आश्रयासाठी हलविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
कोडली पुलाजवळून दावकोण गावांत जाणारा मुख्य रस्ता सायंकाळी पूर्णपणे पाण्याखाली गेला. तसेच नदीच्या काठावर असलेल्या काही घरांपर्यंत पाणी पोचले होते. पण रात्री 10 वा. पर्यंत पावसाचा जोर कमी झाल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात होती. दावकोण गावात साधारण शंभर घरांची वस्ती असून गेल्या वर्षी आलेल्या महापूरात साधारण 85 घरांना फटका बसला होता. शेजारील धुलैय गावातील 40 पैकी 10 घरांमध्ये पाणी घुसले होते. या आपत्तीच्या आठवणी अजुनही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत. या घटनेचा धसका घेऊन दोन्ही गावातील नागरिक गेल्या दोन दिवासांपासून सतत कोसळणाऱया पावसामुळे सतर्क झाले आहेत.