वृत्तसंस्था/ बेंगळुरू
गेल्या काही वर्षांत बऱयापैकी यश मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील भारतीय फिरकी माऱयाचा सामना करणे हे 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणाऱया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सर्वांत कठीण आव्हान असल्याचे म्हटले आहे. ख्वाजा व्हिसाच्या विलंबामुळे अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात दाखल झाल्यानंतर पोहोचलेला असून हा मूळ पाकिस्तानी वंशाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत डावाची सुरुवात करेल.
ख्वाजा भारतात एकदिवसीय सामने तेवढा खेळलेला आहे. 2013 आणि 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा तो भाग राहिलेला असला, तरी त्याला भारतात कसोटी सामने खेळण्याची संधी यावेळी प्रथमच मिळेल. नुकतीच त्याची ऑस्ट्रेलियाचा ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झालेली आहे. 2004-05 नंतर भारतात पहिली मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियांच्या प्रयत्नांत मोठी भूमिका बजावण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे.
‘गेल्या 10 वर्षांत आम्ही बरेच काही, विशेषतः आम्हाला कोणत्या प्रकारच्या खेळपट्टय़ा मिळू शकतात आणि आम्ही कशी चांगली कामगिरी घडवून येथे कसोटी सामने जिंकू शकतो हे शिकलो आहोत. त्यामुळे असे वाटते की, आम्ही पूर्वीपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहोत, पण भारतातील आव्हान नेहमीच कठीण असते, असे ख्वाजाने ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’शी बोलताना म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेपूर्वी सराव सामने खेळणे टाळले आहे. त्याऐवजी गेल्या आठवडय़ातील आगमनानंतर बेंगळुरूजवळ फिरकीस पोषक परिस्थितीत सराव करणे त्यांनी पसंत केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या मते, फिरकी गोलंदाज अश्विनकडून त्यांना सर्वांत जास्त धोका असून त्यामुळे त्यांनी अश्विनच्या ‘डुप्लिकेट’ला घेऊन सराव करण्यास प्राधान्य दिलेले आहे. डावखुऱया फलंदाजांनी भरलेला ऑस्ट्रेलिया संघ अश्विनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सध्या जोरात तयारी करत आहे.
‘अश्विन हा एखाद्या बंदूकसारखा आहे. तो खूप कुशल असून त्याच्याकडे फलंदाजांना चकविण्यासारखे अनेक लहानसहान हातखंडे आहेत आणि तो क्रीजचा वापरही चांगला करतो’, असे ख्वाजाने म्हटले आहे. ‘खरोखरच कठीण आव्हानांपैकी हे एक आहे. येथे खेळपट्टीवर चेंडू कधी तरी वळू लागणार आहे, मग तो पहिला, तिसरा किंवा चौथा दिवस असो. अश्विन खेळत असेल, तर तो बरीच षटके टाकेल. त्यामुळे मी त्याच्याविरुद्ध कसे खेळायचे, धावा कशा काढायच्या याचा विचार करत आहे. जर तुम्ही अश्विनविरुद्ध दीर्घकाळ फलंदाजी केली, तर तो त्याच्या योजनांत बदल करेल. कारण तो एकच गोष्ट वारंवार करणाऱयांपैकी नाही’, असे उस्मान ख्वाजाने म्हटले आहे.
चारही सामन्यांमध्ये फिरकीस पोषक खेळपट्टय़ांवर खेळावे लागण्याची आणि अश्विन, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा हे त्रिकूट नवीन चेंडूने गोलंदाजी करताना अधिकच घातक बनण्याची शक्यता ऑस्ट्रेलिया गृहीत धरून आहे. जर खेळपट्टी चांगली असेल, तर नवीन चेंडूवर फलंदाजी करणे सर्वांत सोपे ठरू शकते. पण भारतात खेळपट्टी खराब झाल्यावर आणि फिरकी गोलंदाज नवीन चेंडूने गोलंदाजी करू लागल्यावर फलंदाजी करणे ही सर्वांत कठीण वेळ असते, असे मत ख्वाजाने व्यक्त केले आहे.