90 टक्के हॉटेल्स फुल्ल, किनारी भागात जनसागर, वाहतूक कोंडी वारंवार!
प्रतिनिधी/ पणजी
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यटकांचे लोंढे उसळले असून गोव्यात येणारी विमाने, रेल्वे, बसेस, पूर्ण क्षमतेने भरून येत आहेत. त्यामुळे 90 टक्के हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. समुद्रकिनाऱयांवरही पर्यटकांचा महाकुंभ दिसून येत आहे. सर्व रस्ते वाहनांच्या वर्दळीने भरून गेले असून वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रकारही घडत आहेत.
गोव्यात नाताळ आणि नववर्षाची सुरुवात करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने येत असल्याने रस्ते आणि किनारी भागात सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. पॅसिनोनगरी पणजी वीज रोषणाई आणि डीजेच्या ठणठणाटाने गजबजून गेली आहे. पॅसिनोंत प्रवेश करण्यासाठी आसुसलेल्या पर्यटकांनी पणजीकडे मोर्चा वळवला आहे. सध्यातरी 2 जानेवारीपर्यंत कोविडसंबंधी कोणतेही निर्बंध, बंधने न लादण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पर्यटकांचा मूड बदलण्यात मदत झाली आहे. असे असले तरी लोकांनी स्वतःहून खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले होते.
नाताळ काळात हॉटेल्समध्ये 90 टक्क्मयांपेक्षा जास्त आगावू बुकिंग झाले असून नववर्षापर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे. कोविड निर्बंध नसल्यामुळे पर्यटन उद्योगाला मदत झाली आहे.
दरम्यान, राज्यात वाढलेल्या रस्ता वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यासंबंधी पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया आणि निधीन वाल्सन यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील प्रमुख शहरे व गावांमध्ये पोलीस संचलन केले. राज्यात 30 टक्क्यांपेक्षा जास्त ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या भागातही पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे.
कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांच्याकडून नाताळाच्या शुभेच्छा
या दरम्यान, राज्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी सर्व गोमंतकीयांना नाताळाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी, ‘नाताळ हा आशा, प्रेम आणि सहवासाचा सण असल्याचे म्हटले आहे. याच दिवशी देव पृथ्वीतलावर आला आणि तेव्हापासून कायम आपल्यासोबत आहे, अशी भावना ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. येशू ख्रिस्ताच्या रुपाने अवतरलेला परमेश्वर मानवतेशी एकरुप झाला. त्याने आम्हाला एकमेकांवर कसे प्रेम करावे, कसा आदर आणि कशी काळजी घ्यावी याची शिकवण दिली, असे म्हटले आहे.