काडसिद्धेश्वर स्वामीजींचे उद्गार : पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात
बेळगाव : भारतीय तत्त्वज्ञानाचा व संत काव्याचा गुरुदेव रानडे यांनी सखोल अभ्यास केला होता. शिवाय तत्त्वज्ञानाशी समन्वय साधून ग्रंथ निर्मिती केली. तसेच विद्यार्थ्यांच्या दोन पिढ्या घडविल्या. देशाला ऋषिमुनी, शूरवीर, साहित्यिक, तत्त्वज्ञान व संस्कृतीची परंपरा आहे, असे विचार कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठाचे जगद्गुरु श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी काढले. गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे लिखित इंग्रजी पुस्तकाचा कन्नड अनुवाद हिंदी संत साहित्यात परमार्थ मार्गाचे प्रकाशन शुक्रवारी हिंदवाडी येथील रानडे मंदिरात झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक पोतदार, शैला एस. एम. पाटील होत्या. एम. बी. जिरली यांनी प्रास्ताविक केले. आशा यमकनमर्डी यांनी स्वागतगीत सादर केले. स्वामीजी पुढे म्हणाले, ऋषिमुनी, तत्त्वज्ञान, रितीरिवाज हे आपल्या देशाचे वैशिष्ट्या आहे. शिवाय विविध जाती-धर्मांमध्ये लोक विखुरले गेले आहेत. भारतीय तत्वज्ञ आणि कुलगुरु, संत गुरुदेव रानडे यांनी अनेक पुस्तके लिहिली. शिवाय अनेकांचा अनुग्रह देऊन भक्ती प्रसारही केला. त्यामुळे त्यांना श्रेष्ठ तत्वज्ञ म्हणून ओळखले जात होते. मराठी, हिंदी व कन्नड संत वाङ्मयातील साक्षात्कार वादाचे सर्वेक्षण करून एक नवीन तत्त्वज्ञान दिले, असे गौरवोद्गार काढले. शैला एस. एम. पाटील यांनी पुस्तकाचा परिचय करून देताना सविस्तर माहिती दिली. स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.