भारतीय धर्मसंस्कृतीने ज्या वृक्ष, वनस्पतींना पवित्र मानलेले आहे, त्यात तुळशीचे रोप विशेष महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. आदिम काळापासून मानवाचा संबंध विविध वृक्षवल्लींशी आला आणि त्यामुळे केवळ फुले, फळे आणि नानाविध अन्नांचे घटक पुरविणारे म्हणूनच नव्हे तर औषधी तत्वांबरोबर त्यांनी आपले संबंध आपल्या धार्मिक, सांस्कृतिक जीवनाशी प्रस्थापित केले. अशा वृक्ष वनस्पतीत तुळशीच्या छोटेखानी रोपाला उल्लेखनीय स्थान लाभलेले आहे. तुळशीच्या रोपात जी औषधी तत्वे आहेत, त्यामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे तिला देवत्व लाभले हे निश्चित सांगणे कठीण. परंतु भारतात हे रोप सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी सूर्यास्तानंतर तिन्ही सांजेपर्यंत वंदनीय ठरलेले आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुतांश घरे, मंदिरांसमोर तुळशी वृंदावन असणे ही परंपरा आणि धार्मिक संचित ठरलेले आहे. त्यामुळे नाना जाती-जमातीत तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे, गंध, पुष्प लावून पूजा करणे आणि प्रज्वलित दिवा लावणे हे महत्त्वाचे ठरलेले आहे.
गोवा-कोकणातील स्त्रियांसाठी तुळस जशी देवता ठरलेली आहे तशीच ती वात्सल्यसिंधु माता आणि जीवाभावाची सखी झालेली आहे. त्यामुळे सकाळी उठून, अंगण सारवून रांगोळय़ा घालून, तिचे पूजन करताना त्यांच्या ओठावर ‘पहिली माझी ओवी गं, दारातल्या तुळशीला’ अशा आशयाची ओवी स्फुरायची ती ‘तुलसी श्री सखी शुभ’ म्हणूनच. श्रीविष्णू, श्रीकृष्ण त्याचप्रमाणे श्रीविठ्ठलाच्या पुजनात तुळशीपत्र किंवा त्यांची माळा हवीच. वर्षातून दोनदा श्रीक्षेत्र पंढरपुरात आषाढात आणि त्यानंतर कार्तिकात ज्या जत्रा होतात, त्यावेळी आपल्या गावातून पंढरपुरी जाणारे वारकरी मस्तकी चंदनी टिळा आणि गळय़ात तुळशीच्या पानांची माळ धारण करणे गरजेचे मानतात. पंढरपुरी वारीला जाणाऱया स्त्रिया मस्तकी पितळी किंवा मातीचे तुळशी वृंदावन धारण करून सहभागी होतात. मृत व्यक्तीच्या मुखात, कपाळावर तुळशीपत्र ठेवले जाते. तुळशी वृंदावनातील माती पवित्र मानून कपाळी लावण्याची परंपरा आहे. प्रवासाला निघताना उजव्या बाजूने तुळशीसमोर नतमस्तक होऊन वळसा घालून पुढे जातात. घरातील धार्मिक त्याचप्रमाणे विवाहादी मंगल कार्याप्रसंगी तुळशी वृंदावनाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाच्या पूजनात विविध फुले अर्पण करण्याऐवजी केवळ त्याला तुळशीपत्र किंवा माळा अर्पण केली तर ते त्याला प्रिय ठरते अशी पूर्वापार लोकश्रद्धा रूढ आहे.
पाने, फुले, फळे देणाऱया वृक्ष वनस्पतीसंदर्भात मानवाला आदिम काळापासून उत्सुकता, विस्मयाची भावना रूढ असून कालांतराने त्यातील काही वनस्पतींना त्यांच्यातील औषधी गुणधर्मामुळे किंवा अन्य बाबींमुळे पावित्र्याचे तेजोवलय निर्माण केले, त्यात तुळशीसारख्या छोटय़ा रोपासंदर्भात लोकमानसाला लोकगीतांची, लोककथांची समृद्ध अशी परंपरा पहायला मिळणे हे खरोखर अचंबित करण्यासारखेच आहे. देव आणि दानवांनी जेव्हा सागरमंथन केले तेव्हा अमृतकलश आला. अमृताच्या प्राप्तीसाठी देव-दानवातील संघर्षात अमृताचे काही थेंब जेथे पडले, तेथे तुळशीचे वृक्ष निर्माण झाले अशी श्रद्धा प्रचलित आहे. या तुळशीच्या रोपाविषयी बऱयाच परंपरा, कथा जन्माला आलेल्या असून एका कथेत तुळशी ही शंखध्वजाची पत्नी तर दुसऱया कथेत ती वृंदा नावाने जालंधर दैत्यांची पत्नी म्हणून संदर्भ आढळतो. शंखध्वज आणि जालंधर हे दोघे दैत्य, देवादिकांना सळो कि पळो करून सोडतात आणि वेळोवेळी पत्नीच्या पावित्र्याच्या सुरक्षा कवचामुळे या दैत्यांना मरण येत नाही, तेव्हा विष्णूकडून पावित्र्य भंग झाल्यावर त्यांचा पराभव होऊन, मृत्यू येतो अशा कथा निर्माण झालेल्या आहेत. आणखी एका कथेत तुळस ही ब्राह्मण कन्या म्हणून जन्माला आली आणि तिला घरातून हाकलून लावल्यावर ती पंढरपूर येथे विठोबाच्या आश्रयाला गेली असता त्याच्या प्रेमात पडली. परंतु रूक्मिणीने तिच्याबाबत विठोबाच्या मनात संदेह निर्माण केलेला कालांतराने दूर झालेला असताना विठोबाने तिचा स्वीकार केला नाही आणि त्यामुळे पश्चात्तापदग्ध झालेल्या तुळशीने धरणीमातेच्या उदरी गुप्त होण्यातच धन्यता मानली. तिच्या प्रेमाखातर विठोबा शोकविव्हळ झाला आणि त्यामुळे तुळशीने वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला. आषाढात झोपी गेलेला श्रीकृष्ण चार महिन्यानंतर आषाढी एकादशीनंतर कार्तिकी एकादशीला जागा होतो आणि म्हणूनच विठोबाचा विवाह वनस्पती रूपातील तुळशीशी करण्याची परंपरा प्रचलित झाली.
कार्तिक महिना मान्सूनच्या पावसाने निरोप घेतल्यावर येत असल्याने, कार्तिकातील एकादशीला प्रबोधनीचा दर्जा देऊन, तुळशीविवाहाचा उत्सव साजरा करण्यात येतो. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशाबरोबर देशाच्या अन्य राज्यातही तुळशी विवाहाचा सोहळा उत्साहाने साजरा केला जातो. मान्सूनच्या पावसानंतर निरभ्र झालेल्या आकाशात लाखो नक्षत्रांचे लुकलुकणे अश्मयुगापासून माणसाला आकर्षित करत आलेले आहे आणि त्यामुळे कार्तिकातील पौर्णिमेच्या चांदण्या रात्री असंख्य छोटय़ा-मोठय़ा दिव्यांची आरास करून देव दिवाळी साजरी करण्याची कल्पना जन्मास आली. याच काळात श्रीविष्णू आणि तुळशीच्या रोपाचा प्रातिनिधीकरित्या विवाह आयोजित करून तो संपन्न झाल्यानंतर विवाहसोहळे साजरे करण्याचा शुभारंभ होतो. काही ठिकाणी आवळय़ाच्या झाडाची आवळय़ासह फांदी आणि तुळशीच्या रोपात लग्न लावले जाते. आवळय़ाच्या वृक्षाला श्रीविष्णूचे रूप मानले जाते. तर गोवा-कोकणात करकणीच्या झुडपाची काठी म्हणजे दिंडा किंवा दिण्याची काठी कलाकुसरीने सजवून नवरा म्हणून तुळशी रोपाशी लग्नासाठी सिद्ध केला जातो. दिंडय़ाचे झुडूप आणि तुळशीचे रोप औषधी गुणधर्माने समृद्ध असून, त्यांच्या लग्नाचा सोहळा हा गोवाöकोकणात मोठा उत्सवच असतो. घरोघरी ज्याप्रमाणे हा सोहळा संपन्न होतो, त्याचप्रमाणे सामूहिकरित्या प्रासादतुल्य घरासमोर आणि मंदिरासमोरही आयोजित केला जातो.
तुळस आणि श्रीकृष्णाच्या विवाह सोहळय़ाच्या लोककथा, लोकगीते पश्चिम घाटातील ग्रामीण भागात पूर्वापार रूढ असून त्यात लोकश्रद्धा, परंपरांबरोबर इथल्या स्त्राr मनाचे समृद्ध भावविश्व पहायला मिळते. त्यामुळे आजही गोवा-कोकणात तुळशीचा पारंपरिक विवाह साजरा केल्यानंतर कौटुंबिक लग्न सोहळय़ाचा शुभारंभ केला जातो. पंढरपुरात कार्तिकी एकादशीला विठोबाची जत्रा संपन्न होते, त्यावेळी वारकऱयांसाठी तुळशी वृंदावनही तेवढेच वंदनीय ठरलेले आहे. त्यामुळे लोकगीतात ‘पंढरी पंढरी नऊ लाखांचा कळस देवा विठ्ठलानी वर लाविली तुळस’ असा उल्लेख आढळतो. वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत तुळशी वृंदावन त्यामुळे धार्मिक संचित ठरलेले आहे. त्यामुळे संत मुक्तेश्वरांनी ‘सकळही तीर्थ वसती तुझिये मुळी। मध्यभागी देव रहातो सकळी’ असे म्हटलेले आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, नित्य वंदिता तुळशी । काळ पळे देशोदेशी ।। तुळस ही विष्णूप्रिया असून कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाहाची प्रथा असली तरी कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाहाचा सोहळा होतो. सर्दी, खोकला, पोटदुखी आदींवर गुणकारी असणारी तुळस काही प्रमाणात आहारात वापरली जाते. शालिग्रामाला विष्णू कल्पून त्याचा विवाह तुळशीच्या रोपाशी लावण्याची लोकपरंपरा भारतीय संस्कृतीच्या बदलत्या ऋतूमानानुसार निसर्ग आणि पर्यावरणात उद्भवणाऱया परिवर्तनाची दखल घेत सण, उत्सव साजरा करण्याचा संदेश देत असते.
– राजेंद्र केरकर