ठिकठिकाणी कोंडी : वाहनधारक हैराण, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी, वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेशिस्त वाहनधारक, रस्त्यावरच पार्क केलेली वाहने, रस्त्यावर पडलेले विकासकामाचे साहित्य आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधिक जटिल बनत चालला आहे. बाजारपेठ आणि अरुंद गल्ल्यांमधून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक होत आहे. शहरात सर्वत्र वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक चिंताजनक बनत आहे.
दिवाळी अगदी जवळ आल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, फोर्ट रोड, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, आरटीओ सर्कल, काकतीवेस रोड आदी भागात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बाजारपेठेतून बाहेर पडताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेबरोबर शहरातील इतर रस्त्यावरदेखील वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजत आहेत.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान-सहान गल्लीतून चारचाकी वाहने ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय विकासकामांसाठी रस्त्यावरच दगड माती टाकली जात असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. सण-उत्सव, मोर्चे त्याचबरोबर मंत्र्यांचे दौरे अशावेळी शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.
दरम्यान, पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या दुपटीने वाढत आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चिंतादायक बनला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा
शहरातील मेणसे गल्ली, खडे बाजार, बस स्टॅण्ड रोड, चव्हाट गल्ली आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशषतः शहराचे प्रवेशद्वार असलेल्या यंदे खूट, सम्राट अशोक चौक, आंबेडकर रोड, कपिलेश्वर उड्डाण पूल आदी ठिकाणी तर प्रचंड गर्दी होत आहे. काही वेळा या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना यातून मार्गस्थ व्हावे लागत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी करण्यात येत आहे.