प्रतिनिधी /बेळगाव
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत खानापूर रोडवर जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम करताना कोणतेच नियोजन न केल्याने याचा फटका वाहनधारकांना सोसावा लागत आहे. बसवेश्वर चौकाजवळ रस्त्याच्या मधोमध खोदाई केल्याने सोमवारी दुपारी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालताना खोदाई करण्यापूर्वी वाहनधारकांना तसेच शहरहासियांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. पण याकडे एलअॅण्डटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ‘अधिकाऱ्यांच्या आले मना तिथे कोणाचे चालेना’ याप्रमाणे एलअॅण्डटी कंपनीने मनमानी कारभार चालविला असल्याची तक्रार शहरवासीय करीत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून खानापूर रोडवर जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. येथील बसवेश्वर चौकापासून दत्त मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. याकरिता गेल्या दोन दिवसांपासून खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारपेठ, सोमवारपेठकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांसह पालकांची ये-जा सुरू असते. पण रस्ता बंद झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडने मुश्कील बनले आहे. या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनधारकांच्या समस्येत भर पडली आहे. नियोजनाअभावी शहरवासियांना याचा फटका बसत असून सोमवारी दुपारी या ठिकाणी वाहनधारकांना अडकून पडावे लागले. खोदाईपूर्वी वाहतूक वळविण्याच्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. पण कोणतेच नियोजन न करता जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत असल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हाती घेतलेली कामे तातडीने पूर्ण करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.