सातारा (पाचगणी) प्रतिनिधी
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई गणपती मंदिर पुलावर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. अद्यापही या वाहतुकीच्या नियंत्रणावर व वाहतुकीच्या कोंडीवर वाई वाहतूक विभागाच्या पोलिसांचे अजिबात लक्ष नसल्याने वाईकरांचा संताप व्यक्त होऊ लागला आहे
दरम्यान मोठा ब्रिटिशकालीन पूल जमीन दोस्त केल्यानंतर नव्या पुलाची बांधणी युद्ध पातळीवर सुरू असतानाच नवीन पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होतोय याच्या प्रतीक्षेत वाईकर असतानाच पर्यायी वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या पुलावर बेशिस्त पार्कींग होणारी दुचाकी,चार चाकी तसेच हातगाडी यामुळे या पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी विस्कळीत होत असते. मात्र याचे वाई पोलीस यंत्रणेला कसलेही सोयर सुतक नाही. ट्रॅफिक पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट आणि भलतीकडेच लक्ष अशी अवस्था सध्या वाईत ट्रॅफिक पोलिसांची आहे. पोलीस भलत्याच ठिकाणी शिट्ट्या मारतात मात्र या एकमेव पर्यायी वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पोलीस अद्यापही कधी शिट्ट्या मारताना दिसून येत नाहीत.
त्यामुळे वाईकर व आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात या वाहतुक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. यातच दक्षिण काशी मानाचा महागणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वाईच्या गणपतीला पर्यटकांची मोठी गर्दी असतेया पर्यटकांना देखील वाई मध्ये गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर या वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जाण्याची वेळ येते.
त्यामुळे पुन्हा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील आता या पुलावरून गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वेळेत पोहोचता येईल का असा सवाल देखील उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्थानिक नगरपालिका व स्थानिक ट्रॅफिक पोलीस यंत्रणेला आता खऱ्या अर्थाने शिस्त कोण लावणार हा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.