कॉँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू : वाहनचालक त्रस्त
बेळगाव : खानापूर रोडच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता एका बाजूचा रस्ता बंद ठेवण्यात आला असून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक केंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहनधारकांना वर्दळीतून ये जा करण्यास विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खानापूर रोडच्या रस्त्याचे कामे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले नव्हते. त्यामुळे बसवेश्वर चौक ते तिसऱ्या रेल्वेगेटपर्यंत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात येत आहे. याकरिता यापूर्वी ठिकठिकाणी आडव्या पाईप घालण्यात आल्या होत्या. तसेच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे डांबरीकरणदेखील करण्यात आले होते. मात्र आता लागलीच काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले, पण तिसऱ्या रेल्वेगेटच्या उभारणीचे काम सुरू असल्याने या रस्त्यांचे काँक्रीटीकरण रखडले होते. जुना धारवाड रोड आणि खानापूर रोड या दोन्ही रस्त्यांच्या विकासासाठी 19 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सदर काम महापालिका किंवा स्मार्टसिटी कंपनीतर्फे न करता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येत आहे. सध्या ओल्ड पी. बी. रोड आणि खानापूर रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तिसऱ्या रेल्वेगेटपासून बसवेश्वर चौकापर्यंत काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यात आला असून एका बाजूचा रस्ता बंद आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. विविध महाविद्यालये, औद्योगिक वसाहत आणि टिळकवाडी, अनगोळ, वडगाव अशा विविध भागात जाण्यासाठी खानापूर रोड महत्त्वाचा आहे. काँग्रेस रोड आणि खानापूर रोड या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीचा ताण अधिक असतो. अशातच आता खानापूर रोडचे काँक्रीटीकरण होत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याचे कामदेखील अर्धवट झाले आहे. अन्यथा या रस्त्यांचा वापर केला जातो. पण आता वाहनधारकांना खानापूर रोडवरूनच ये जा करावी लागत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी सकाळी अनगोळ नाका ते आरपीडी कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समोऊन येणारी वाहने आणि अनगोळकडून शहरात जाणारी वाहनांची गर्दी वाढली होती. त्या वाहतूक कोंडीमध्ये वाहनधारक अडकून राहिल्याने वेळेत निश्चित स्थळी पोहोचता आले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली. तर रस्त्याच्या विकासाचे काम करताना पर्यायी रस्त्यांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.