बसवेश्वर चौक ते तिसऱ्या रेल्वेगेटपर्यंतच्या खानापूर रोडचे काँक्रिटीकरण : पूर्वसूचना न दिल्याने गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. पण बसवेश्वर चौक ते तिसऱ्या रेल्वेगेटपर्यंतच्या खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र काम सुरू करण्यापूर्वी याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देणे आवश्यक आहे. पण कोणतीच पूर्वसूचना न देता खानापूर रोडवरील वाहतूक एका बाजूने बंद ठेवून एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. बुधवारी दत्त जयंती उत्सवामुळे बसवेश्वर चौक परिसरातील दत्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र गुऊवारी सकाळी मंदिरासमोर खोदाईचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. रस्त्याचे काँक्रिटीकरण व पाईप घालण्याचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने मंदिरासमोर वाहतूक वळविण्यात आली होती. परिणामी याठिकाणी वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. ऐन गर्दीच्यावेळी रस्ता बंद केल्याने मंदिरामध्ये आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काँक्रिटीकरणासाठी एका बाजूचा रस्ता बंद ठेवून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना कळविणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिक पर्यायी रस्त्याने ये-जा करू शकतात. पण याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. तिसरा रेल्वेगेट ते बसवेश्वर चौकपर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरणासाठी विविध कामे केली जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करणे आवश्यक आहे.