वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारक त्रस्त, रहदारी पोलीस नियुक्त करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोड आणि खडेबाजार शहापूर मुख्य रस्त्यावरील अडथळे हटवून रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. तरीदेखील या रस्त्यावर व्यवसाय थाटलेल्या फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरील अडचणीत वाढ झाली आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून सोमवारी सकाळी शहापूर-खडेबाजार परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागले.
शहरात वाहनांची संख्या वाढत चालली असून, रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांचे रुंदीकरण करून विकास केला आहे. मात्र हे रस्तेदेखील अपुरे पडत आहेत. ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी रस्त्यावर व्यवसाय थाटले असून या व्यावसायिकांसाठीच रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
सहसा बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र शहापूर बाजारपेठेचे महत्त्व वाढत चालले असून, बाजारपेठेत येणाऱया ग्राहकांमुळे गर्दी वाढत आहे. दोन वर्षापूर्वी खडेबाजार रस्त्यावरील अडथळे हटवून रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण केले आहे. तरीदेखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. सोमवारी सकाळी शहापूर-खडेबाजार रस्त्यावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या परिसरात रहदारी पोलीस नियुक्त करण्याची मागणी होत आहे.