रेलगाडी रेलगाडी झुक झुक झुक झुक
बीचवाले स्टेशन बोलें रुक रुक रुक रुक
मुलात मूल होऊन खेळणारे खास धोती कुरतावाले अशोककुमार यात इतके खरेखुरे साधेसुधे मध्यमवर्गीय काकाजी दिसले आहेत! मुलांसाठी असलेल्या या गाण्याचं संगीत सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचं आहे आणि गीत हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं. खरं तर या गाण्यात गाणं नाहीच! म्हणजे नुसतं गद्य ठेक्मयात म्हटलेलं आहे. पण नुसत्या ठेक्मयाच्या मदतीने काय काय मजा आणता येते हे त्या गाण्यातून कळतं. अशोककुमारनी ते स्वतः गायलं आहे. रेल्वे गाडी म्हणजे कुणाही लहान मुलाला भरपूर आवडणारा खेळ! चुटकीसरशी मुलं तयार होतात. पहिलं कारण म्हणजे भरपूर जणांना एकत्र खेळता येतं आणि नुसते डब्यापाठी डबे होऊन धावलं की झालं. पुढच्याने शिट्टी आणि मागच्याने हात हलवत राहिलं की कामच झालं. तसं भू।़।़।़र जायचं आकर्षण मुलांना अगदी लहानपणापासूनच सगळय़ात जास्त असतं. त्यामुळे खरोखरचा प्रवास करायची वेळ झाली की सगळय़ात आधी तयार होऊन बसलेला मेंबर म्हणजे घरातलं लहान मूल! एरवी अभ्यासासाठी किंवा शाळेसाठी उठायला कुरकूर करणारी पोरं सहलीच्या दिवशी आईबापांच्या आधी उठतात. गंमतच नुसती! कोकणात जरी रेल्वे उशीरा प्रकट झाली असली तरीही ‘मामाच्या गावाला जाऊया’ चा प्रवास मात्र झुकझुक ‘झुकझुक आगीनगाडी’ नेच सुरू झाला होता. गाडी आणि गाणी यात फरक एकाच अक्षराचा. म्हणूनच की काय पण गाडीवर गाणी होतात. गाण्यांमधून गाडय़ा येतात. गाडीत बसल्यानंतर पहिल्यांदा हात म्युझिक प्लेयरवर जातो. आणि बहुतांश गाडय़ांमध्ये तो असतोच. प्रवासासाठीची खास गाणी असतात.
गाडी बुला रही है सीटी बजा रही है
चलनाही जिंदगी है चलती ही जा रही है
शिट्टी वाजवत गाडी आपल्याला बोलावते आहे असं खरंच वाटतं. चाकं पळती रहाणं हे गाडीचं जीवन असतं. एका जाग्यावर विसावलेली गाडी निरुपयोगी होऊन जाते. ठप्प होते. म्हणूनच की काय पण गाडीची गाणीसुद्धा तिच्यासारखीच गतिमान असतात. या गाण्याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा ठेका हा हुबेहूब गाडीच्या ठेक्मयासारखाच असतो. उदाहरणार्थ ‘मुसाफिर हूँ यारों’ मध्ये नायक टांग्यातून जाताना दाखवला आहे आणि गाण्याचा ठेका आणि लय टांग्याचा वेग आणि गती यांच्याशी मिळतीजुळती आहे. ‘माँग के साथ तुम्हारा मैंने माँग लिया संसार’ या गाण्याला तर घोडय़ाच्या टापांची लय आणि आवाजही सोबतच आहे.
चला खेळू आगगाडी. झोका उंच कोण काढी?
कशासाठी पोटासाठी खंडाळय़ाच्या घाटासाठी
आली मुंबई या जाऊ, राणीचा तो बाग पाहू.
गर्दी झगमग हाटी, कशासाठी पोटासाठी
आपण हळूहळू लहानाचे मोठे होत जातो. झोक्मयावर आगगाडी खेळताना आपल्याला ‘कशासाठी पोटासाठी’चा फक्त जोश आणि ते म्हणत गाडी खेळण्याची मजाच तेवढी माहीत असते. त्याचा परिणाम इतका असतो की गाडीत बसल्यानंतर तिच्या आवाजात आपल्याला सारखं सारखं ‘कशासाठी पोटासाठी’ ‘कशासाठी पोटासाठी’ च ऐकू यायला लागतं (तो आवाज तसाच असतो बरं!) पण मोठे झाल्यावर आयुष्यातले रंग खुणावू लागतात! हिरव्या गुलाबी छटांनी दिवस रंगीत होतात आणि मग
अंधाराची रात, धुंद बरसात, आली अवचित माझ्या दारी
डोक्मयाने मंद, त्यात गाडी पडली पडली बंद, झाली सैरभैर, थोडी गोरीमोरी
अशी प्रेमकथा फुलायला लागते. किंवा मग
प्रेमाची ही गाडी, त्यात परी बसली
तिच्या गाली बघा माझी प्रीत हसली
माझी प्रेमनगरी, खरी प्रेमनगरी
असं म्हणत गाडी जी धावायला लागते ती मग
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट.
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळय़ाचो घाट?
पुणा मुंबय हीच गो तुज्या सासरची वाट
असं म्हणत चेडवाला सासरी पोचवूनच मोकळी होते. आणि मग परत ‘मामाच्या गावाला जाऊया’ म्हणणारी चिलीपिली गाडीच्या गाण्यांची परंपरा कायम ठेवतात. एकूण माणसाच्या आयुष्याचा प्रवास आणि गाडीचा प्रवास यात खूप साम्य आहे हे जाणवतं. कितीतरी दुःखं आपण गाडी बरोबरच फलाटावर, स्टेशनवर, रस्त्यावर, सोडून आलेलो असतो.
कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ.
अपुल्याच मनातिल स्वप्ने, घेऊन मिटावी मूठ
पण मूठ उघडण्यापूर्वी, चल निघुया पाउल म्हणते.
पण पाऊल निघण्यापूर्वी, गाडीच अचानक निघते
आठवा सलीलदाचं हे गाणं. आपला हळवा, दुखरा कोपरा चाळवला जातो. निघालेली गाडी, तिच्याबरोबर निघालेला माणूस आणि फलाटावर राहिलेला माणूस या तिघांच्या अवस्था वेगवेगळय़ा! घालमेल वेगवेगळी! नजरेसमोरून हललेली गाडी, सरकत सरकत भराभर पुढे जाणारे डबे, शेवटचा डबा निघून गेल्यावर अंगावर भक्कन येणाऱया त्या हवेबरोबरच आलेलं रितेपण, एकेका वळणासरशी दिसेनाशी होत जाणारी गाडी, मंदावणारा तो खडखड आवाज, शेवटी रिकामे रूळ, उडून खाली बसलेली धूळ, पडलेले सिग्नल, सगळी सगळी रिकामी शांत चौकट, मग गर्दी असो वा झाडी, जाणाऱयाला पोचवून परत येणारा माणूस अगदी एकटा असतो. आणि जाणाऱयाचं काय? तर मागे पडत जाणारं गाव, दिसेनासं झालेलं आपलं माणूस, परत भेट कधी होणार? कदाचित नाही, कदाचित भूमिका बदलतील, आता गाडीबाहेर सगळं कसं परकं परकं वेगळं वाटतं. आणि गाडीच्या आतलं सगळं अनोळखी! घरचा, घरातल्या वस्तूंचा तो गंध, माणसांचं बोलणं, तो भवताल अजूनही आपल्याभोवती असतोसं वाटतं. भूतकाळाचा तो तुकडा असोशीने देहाभोवती घट्ट लपेटून घेण्याचा प्रयत्न होतो, पण तो विफल ठरतो. दोन वर्तुळं वेगळी करणारी गाडी मात्र त्याच निर्विकल्पपणे धावत असते. काय सांगायचं?
‘सवेरेवाली गाडी से चले जाएँगे’ म्हणणारा शम्मी कपूर किंवा ‘यादों पे बसर करते है’ म्हणणारा संजीव कुमार आठवतात ते याच कारणासाठी. कोणतीही गोष्ट कायम नसते. आयुष्य हीच एक रेलगाडी असते.
अरे कोठून कोठ पोहचली मी
कोठे माझी वारी
अंधाराची गाडी झुकझुक गाडी
अंधाराची गाडी झुकझुक गाडी
असला हा विचित्र हिशोब असतो. टेन किंवा एकूणच गाडी या विषयावर ‘बर्निंग टेन’ सारखे अनेक चित्रपट बनले. किंवा कितीतरी गाणी त्यावर झाली. पण प्रवास असाच अखंड सुरू राहिला आहे. कितीतरी माणसं काळाच्या रेलगाडीत बसून बघता बघता निघून जातात. ‘स्मशान’ नामक स्टेशनवर त्यांना कायमचा निरोप द्यायला माणसं जमतात. धडाडधूर होतो आणि सगळं काही पुसून जातं. अशा प्रत्येक निरोपासरशी आतला कुणीतरी सांगतो, या गाडीत बसायची तुझीही वेळ जवळ येत आहे हं! गाडी बुला रही है सीटी बजा रही है!
-ऍड. अपर्णा परांजपे प्रभू