थांबे कमी करूनही परिणाम शून्यच
प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावरील थांबे कमी करूनही कोकण रेल्वेगाडय़ा विलंबानेच धावत असल्याने प्रवाशांना रखडपट्टीला समोर जावे लागत आहे. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने शुन्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाडय़ांचे काही थांबे कमी करत त्यांचे रूपांतर एक्सप्रेसमध्ये केले. मात्र, तरीही रत्नागिरी-दिवा, सावंतवाडी-दिवा या 2 गाडय़ा उशिरानेच सुटत असल्याने प्रवाशांना तासन्तास स्थानकातच तिष्ठत बसावे लागत आहे. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी ही बाब उघड केली आहे.
मध्य रेल्वेने दिवा व रोहा दरम्यान 9 थांबे कमी केले आहेत. तर कोकण रेल्वेवर नव्याने बांधलेल्या कळंबणी बुद्रुक व कडवई येथे वाढीव थांबे देण्यात आले आहेत. गाडीचा वेग कमी करून थांबा घेवून पुन्हा वेग पकडण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. त्यानुसार कमी केलेल्या 7 थांब्यांमुळे गाडीचा प्रवास वेळेत 35 मिनिटे ते 1 तास 10 मिनिटे इतकी घट होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला 10 मिनिटे तर दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला 5 मिनिटे इतकीच घट झाली आहे.
कमी केलेल्या थांब्यांमुळे गाडय़ांच्या प्रवासावेळी 1 तास 25 मिनिटे ते 2 तास 50 मिनिटे इतकी घट अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला 10 मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसला 20 मिनिटे इतकीच घट झाली आहे. झालेली घट ही केवळ कागदावरच असून दोन्ही गाडय़ा अर्धा ते एक तास उशिरानेच पोहचत असल्याचे समोर आले आहे. दिव्याहून प्रवास करणे दक्षिण व मध्य मुंबई तसेच पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोयीचे नसल्याची बाब देखील पुढे आले आहे.
मुंबईतून सुटून सावंतवाडीकडे जाणाऱया इतर गाडय़ा असल्या तरी त्यांची तुलना दिवा-सावंतवाडी किंवा दिवा-रत्नागिरी गाडय़ांसोबत होवू शकत नाही. या दोन्ही गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर जवळजवळ सर्वच स्थानकांवर थांबतात. यामुळे मध्य रेल्वेने रत्नागिरी-दिवा पॅसेंजर व सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस दादरपर्यंत चालवणे आवश्यक असल्याचे मतही महापदी यांनी व्यक्त केले आहे.
दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला मध्य रेल्वेच्या हद्दीतच 1 तास उशीर होतो. यामुळे सर्वच वेळापत्रक कोलमडून गाडीला आणखीनच उशीर होत जातो. पूर्वी पनवेलला डिझेल भरण्यातही वेळ जात होता. मात्र, आता ही गाडी विद्युतशक्तीवर चालत असल्याने ती गरज भासत नाही. मात्र, तरीदेखील या दोन रेल्वेगाडय़ा रोजच उशिरानेच पोहचत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी–दिवा पॅसेंजरला सदैव विलंब
रत्नागिरी येथून मुंबईला जाणारे प्रवासी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पकडण्यासाठी रातोरात स्थानक गाठून तेथेच ठाण मांडतात. मात्र, ही पॅसेंजर विलंबानेच सुटत असल्याने प्रवाशांचे आणखीनच हाल होतात. याशिवाय ही पॅसेंजर नेमकी कधी मार्गस्थ होईल, या बाबतही प्रवाशांना ध्वनीवर्धकाद्वारे कुठलीच कल्पना दिली जात नसल्याची बाब देखील समोर आली आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर सदानकदा विलंबानेच धावत असल्याने त्या-त्या स्थानकात प्रवाशांचा खोळंबा होत असून या प्रक्रियेला पूर्णविराम मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘एर्नाकुलम-निजामुद्दीन’ साप्ताहिक आजपासून 20 एलएचबी डब्यांची धावणार
कोकण मार्गावर धावणाऱया एर्नाकुलम-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी 2 अतिरिक्त एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 22655/22656 क्रमांकाची एर्नाकुलम-निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस 23 नोव्हेंबरपासून 20 एलएचबी डब्यांची धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. यापूर्वी ही एक्स्प्रेस 18 एलएचबी डब्यांची धावत होती. प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हापा–मडगावला एक स्लिपर श्रेणीचा डबा वाढवला
कोकण मार्गावर धावणाऱया 22908/22907 क्रमांकाच्या हापा-मडगाव एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लिपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे. त्यानुसार ही एक्स्प्रेस 23 रोजी व परतीच्या प्रवासात 25 नोव्हेंबर रोजी एक अतिरिक्त डब्याची धावणार आहे.
‘तेजस एक्सप्रेस’ही 25 पासून धावणार विजेवर
कोकण मार्गावर धावणारी सीएसएमटी मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसही 25 नोव्हेंबरपासून विजेवर चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. त्या पाठोपाठ आणखी 2 एक्सप्रेसही विद्युतशक्तीवर धावणार आहेत. 22115/22116 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक एक्सप्रेससह समावेश असून ही एक्सप्रेस 24 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे. या पाठोपाठ 22113/22114 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेसही 26 नोव्हेंबरपासून विजेवर चालवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान व सुखकर होणार आहे.