वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज युवा संघटनेच्यावतीने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने गावामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अनिल काकतकर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व अभियंते आर. एम. चौगुले, देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा सरिता नाईक उपस्थित होत्या. सेपेटरी भरमा आनंदाचे यानी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतर आर. एम. चौगुले यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून सांगितले. तर संघटनेचे उपाध्यक्ष सुजित मंडोळकर यांनी प्रत्येक कार्यकर्ता व नागरिकांनी कमीत कमी वर्षाला एक तरी झाड लावून ते जगवावे, असे आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, देवकी पंच कमिटी सदस्य, धर्मस्थळच्या अधिकारी, उचगाव विभाग आरोग्य खाते, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष नारायण शहापूरकर यांनी केले. अध्यक्ष अनिल काकतकर यांनी आभार मानले.