प्रशासनाचा निषेध : शहरातील तिन्ही उड्डाणपुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष : उड्डाणपूल वाहनधारकांसाठी ठरताहेत धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रेल्वेफाटकांवरील अडथळे दूर करण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र उड्डाणपुलांवर निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासन आणि रेल्वे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. जुना धारवाड रोड येथील जिजामाता चौकात उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर खड्डा निर्माण झाला असून वाहनधारकांना धोका बनला आहे. त्यामुळे यामध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी चार उड्डाणपूल उभारण्यात आले असून यापैकी एका उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र यापूर्वी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या देखभालीकडे महापालिका आणि रेल्वे खात्याने दुर्लक्ष केले आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. गोगटे चौकातील बसवेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप वर्षभरापासून बंद आहेत. या उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वर्दळीचा रस्ता असूनही पथदीप दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे उड्डाणपुलांवरील समस्यांचे निवारण कोण करणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
जुना धारवाड रोड येथील फाटकावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. जिजामाता चौकात उड्डाणुपलाच्या प्रवेशद्वारावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने पुलावरून खाली येणाऱया वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. खड्डय़ामुळे दुचाकी आणि लहान वाहनधारकांना नाहक त्रास होत असून अपघात होण्याची शक्मयता आहे. उड्डाणपुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यानेच समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत रेल्वे खात्याकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे.
आता तरी शासनाला जाग येणार का?
शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्डय़ामध्ये वृक्षारोपण केले. या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी खड्डय़ामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील सर्व उड्डाणपुलांवर निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शासनाचा निषेध वृक्षारोपणाच्या माध्यमातून करण्यात आला. आता तरी शासनाला जाग येणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.