वृक्षांवर प्रेम करा आणि त्यांचे संवर्धन आणि संगोपन करा, असा संदेश आपल्याला वारंवार दिला जातो. आपल्यापैकी बहुतेक जण तो मनावर घेत नाहीत. तथापि, देवरिया (उत्तर प्रदेश) येथील आचार्य चंद्रभूषण तिवारी यांनी वृक्षांना केवळ आपलेसे केले आहे, असे नाही तर त्यांना आपली अपत्ये मानली आहेत. त्यांचे निसर्ग प्रेम इतके तीव्र आहे, की त्यांनी केंद्रीय विद्यालयातील शिक्षकाची मोठय़ा वेतनाची नोकरीही सोडली आहे. त्यांनी 26 जानेवारी 2006 या दिवशी अकरा लाख झाडे लावण्याचा संकल्प केला होता. आतापर्यंत साडेनऊ लाख वृक्षांचे रोपण त्यांनी केले आहे. कोणताही वृक्ष वठण्याच्या मार्गावर आहे, असे त्यांना दिसून येताच ते त्याला पुनर्जिवित करण्याच्या प्रयत्नाला लागतात. स्वतः वृक्षारोपण करतानाच लोकांच्या मनातही त्याबद्दल आस्था निर्माण व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. विविध वृक्षांची रोपटी ते विनामूल्य इतरांना देतात आणि त्यांना लावावयास सांगतात. विशेषतः फळझाडे लावण्यावर त्यांचा भर आहे. कारण ही झाडे मोठी झाल्यानंतर माणसाचे पोट भरू शकतात. त्यांच्या वृक्षप्रेमाची दखल राज्य सरकारनेही घेतली असून त्यांना पुरस्कार आणि आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत 25 हून अधिक पुरस्कार पटकाविले आहेत. सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनातून आपण प्रेरणा घेतली आणि वृक्षांना अपत्ये मानण्यास प्रारंभ केला, असे ते अभिमानाने सांगतात. त्यांचे लहान मुलांना सांगणे असे असते, की पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतील उरलेले पाणी इकडे तिकडे न टाकता कुठल्यातरी झाडाच्या मुळात घाला. त्यातूनही झाडाला जीवनदान मिळू शकते. इतक्मया सूक्ष्मपणे त्यांनी पर्यावरणविषयक प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
Previous Articleआजचे भविष्य शनिवार दि. 21 मे 2022
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.