केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोधाचा संकल्प
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील एका आदिवासी संघटनेने म्यानमार सीमेवर तारांचे कुंपण घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने शहरात एक सार्वजनिक सल्लामसलत कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात भारत-म्यानमार सीमेवर तारांचे कुंपण घालणे आणि मुक्त आंदोलन व्यवस्था रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविण्याचा ठराव संमत करण्यात आल्याचे आयटीएलएफकडून सांगण्यात आले.
मुक्त संचार व्यवस्था सीमेच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांना व्हिसाशिवया परस्परांच्या क्षेत्रात 16 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्याची अनुमती देते. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या चार राज्यांची म्यानमारला लागून 1643 किलोमीटर लांब सीमा आहे. आयटीएलएफने कुकी जो लोकांच्या राजकीय भविष्यासाठी मिझोरम सरकारशी संपर्क साधण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट करण्यात आल्यावर तेथील 31 हजारांहून अधिक लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे. अनेक लोकांनी मणिपूरमध्ये देखील धाव घेतली आहे. म्यानमार सीमेवरील मुक्त संचाराची व्यवस्था समाप्त करत सीमेवर तारांचे कुंपण घालण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 20 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे बोलताना केली होती.