विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्न-नागरीपुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती यांच्यासह अलीकडेच निधन झालेल्या मान्यवरांना सोमवारी विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले.
सोमवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडून अलीकडेच निधन झालेल्या मंत्री उमेश कत्ती यांच्यासह इतर मान्यवरांच्या कार्याचे स्मरण केले. माजी मंत्री एम. रघुपती, प्रभाकर राणे, सी. यादवराव, माजी आमदार के. केम्पेगौडा, जी. व्ही. श्रीरामरेड्डी, सी. एम. देसाई, ए. जी. कोडगी, इशण्णा गुळगण्णावर, प्रसिद्ध गायक शिमोगा सुब्बण्ण आणि इंग्लडची राणी एलिझाबेथ-2 यांना देखील विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, मंत्री उमेश कत्ती आज सभागृहात आपल्या सोबत पहिल्या रांगेत आसनस्थ झाले असते. मात्र हे नियतीला मान्य नव्हते. उमेश कत्ती हे एक कार्यतत्पर राजकारणी होते. त्यांना सामान्य ज्ञान अधिक होते. लहान वयातच मोठमोठय़ा जबाबदाऱया त्यांनी सांभाळल्या होत्या. बेळगावच्या राजकारणात ते अत्यंत प्रभावी होते. अनेकवेळा पक्ष बदलला तरी लोकांनी त्यांचा हात सोडला नाही. अन्न-नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी सांभाळताना रेशन अंतर्गत ज्वारी आणि नाचना वितरीत करण्यात कत्ती यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे वनमंत्री म्हणून टस्करांना रोखण्यासाठी अत्याधुनिक कुंपण घालण्याची व्यवस्था त्यांनी यशस्वीपणे राबविली होती. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शोकभावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे आमदार एम. रमेशकुमार, कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी अलीकडेच निधन झालेल्या मान्यवरांच्या स्मृतींना उजाळा देऊन शोक व्यक्त केला. त्यानंतर सभागृहात काहीवेळ मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले.