लडाखमध्ये आयटीबीपी जवानांची कामगिरी
वृत्तसंस्था/ लेह
लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 12 हजार फुटांच्या उंचीवर राष्ट्रीय ध्वज फडकविल आहे. भारत सरकार 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. याच्याच अंतर्गत आयटीबीपी जवानांनी ही कामगिरी करत त्याची छायाचित्रे शेअर केली आहेत.
याचबरोबर जवानांनी देशवासीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सर्व नागरिकांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्टपर्यंत स्वतःच्या घरांवर तिरंगा फडकवावा असे जवानांनी म्हटले आहे. आझादी का अमृत महोत्सव संबंधी देशातील अनेक भागांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सरकार तसेच स्वयंसेवी संस्थांकडून आयोजित केले जात आहेत. यात तिरंगा यात्रेचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये हर घर तिरंगा कार्यक्रम राबविला जात आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार दोन कोटी ध्वजांचे वाटप करणार आहे.
उत्तरप्रदेशात 17 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य सप्ताह साजरा केला जाणार आहे. मध्यप्रदेशातही हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी प्रशासनाने विशेष तयारी चालविली आहे. राजस्थानातही हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी तयारी केली जात आहे. याकरता राज्य सरकारच्या सर्व विभागांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजस्थानात 10 कोटी ध्वज फडकविण्यात येणार असल्याचा अनुमान आहे.