राष्ट्रपतींवरील टिप्पणीप्रकरणी भाजप खासदाराकडून तक्रार दाखल
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या विधानामुळे निर्माण झालेले टीकेचे वादळ पाहून सदर मंत्र्याने दिलगिरी व्यक्त केली असली तरी देशाच्या प्रथम नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱया राष्ट्रपतींविरोधात केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत.
भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी गिरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी केलेले वक्तव्य अपमानजनक असल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. अखिल गिरी यांच्याविरोधात दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदारांनी केलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड विधान आणि एससी-एसटी अधिनियमाला अनुसरून तातडीने कारवाई करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दिसण्याबद्दल अखिल गिरी या मंत्र्याने काही खोडसाळ आणि अवमानजनक शब्द वापरले होते. तृणमूल काँग्रेसनेही याप्रकरणी हात झटकले असून मंत्र्याच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, मंत्र्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात कानावर हात ठेवले आहेत. द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या असल्याने त्या राज्यात विशेष करून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात अपमानास्पद टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला होता. ज्यामुळे भारतीय जनता पक्षाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कठोर कारवाई केल्याखेरीज या मंत्र्याचा माज उतरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
स्मृती इराणींनीही केली कारवाईची मागणी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या मुद्दय़ावर मौन का बाळगून आहेत? असा प्रश्न करतानाच संबंधित मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. गिरी यांनी केलेले वक्तव्य अपमानजनक असल्याने मंत्र्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.