सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडियाच्या आजच्या काळात सत्याधारित वृत्तांकन अवघड बनत चालले आहे. खोटय़ा वृत्तांच्या महापुरात सत्याचा बळी जात असून ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. आजच्या वेगवान युगात संयम आणि सहिष्णुता यांचे स्थान झपाटय़ाने कमी होत आहे. विषय समजून न घेता आपल्याला विरोध करणाऱयांना ट्रोल करण्याचे कार्य सोशल मीडियावरून सुरू आहे. ही आक्हानात्मक परिस्थिती असून त्यावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियावर बनावट, असत्य किंवा अर्धसत्य वृत्ते ज्या वेगाने पसरतात, त्या वेगाने सत्य वाटचाल करू शकत नाही. त्यामुळे सत्याचा बळी जाण्याची शक्मयता असते. अफवा एखाद्या बीजाप्रमाणे रोवल्या जातात आणि झपाटय़ाने त्यांचा महावृक्ष बनतो. अशाप्रकारे एका अफवेची एक संकल्पना तयार होते आणि लोकांना तीच सत्य वाटू लागते. तर्काच्या आधारावर शांत चित्ताने विचार करून मत बनविण्याचा काळ मागे पडला आहे, असे जाणवते, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. समाजाने परिस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारताची घटना हे उत्तम उदाहरण
भारताची घटना हे जागतिकीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्यावेळी घटनेची निर्मिती झाली, तेव्हा ते देशात परिवर्तन आणण्यासाठी निर्माण केले गेलेले साधन होते. जगातील अनेक घटनांचा अभ्यास करून त्यातील उत्तमोत्तम भाग निवडून आपली घटना तयार करण्यात आली आहे. या घटनेत केवळ जगापासून घेतलेली पेरणा नाही तर देशातील लोकांची आवश्यकता आणि त्यांच्या आकांक्षा यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे, असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. आज आपले जीवन जगात घडणाऱया वेगवेगळय़ा घटना आणि उत्पादने यांच्या प्रभावाखाली आहेत. जागतिकीकरणाच्या संदर्भात आपण विवेकपूर्ण पद्धतीने पावले उचलली पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.
न्यायाधीशसुद्धा ट्रोलिंगचे बळी
भारतीय घटना जेव्हा तयार करण्यात आली, तेव्हा जागतिकीकरण ही संकल्पनाही कोणाला माहिती नव्हती. तसेच त्यावेळी इंटरनेटही नव्हते. आज या दोन्ही बाबी आपल्याकडे आहेत. इंटरनेटवर लोक त्यांची मते आणि भावना व्यक्त करतात. न्यायाधीशांनाही त्यांनी दिलेल्या निर्णयांबद्दल ट्रोल केले जाते. त्यापासून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. मात्र लोकांनीही सद्सद् विवेकबुद्धीच्या आधारावर आपले विचार व्यक्त करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.