खासदार संजय राऊत यांना युवा समितीचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावसह संपूर्ण सीमाभाग 1956 पासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. मागील काही वर्षांपासून कर्नाटक सरकार कन्नडसक्तीचे धोरण राबवित असून संविधानात दिलेल्या भाषिक अधिकारांची पायमल्ली होत आहे. महाराष्ट्र दिनी शुभेच्छा देणाऱया तरुणांवरही गुन्हे दाखल केले जात असल्याने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱयावर असून, यावेळी त्यांनी युवा समिती व बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली. आसाम-मेघालय या दोन राज्यांमधील सीमाप्रश्न केंद्रीय गृहमंत्रालयाने ज्याप्रकारे सोडविला त्याप्रकारे बेळगावचाही सीमाप्रश्न सोडवावा, अशी मागणी राऊत यांच्याकडे करण्यात आली. संजय राऊत यांनी सीमावासियांना आश्वासन देत शिवसेनाच सीमाप्रश्न सोडवेल, अशी ग्वाही दिली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, सूरज कणबरकर, नरेश पाटील, नागेश बोभाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.