भारतीयांनी काही सवयी त्वरित बदलण्याची गरज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी काळात भारताला कॅन्सर (कर्करोग)सारख्या घातक आजारांच्या त्सुनामीला (रुग्णसंख्येत प्रचंड वाढ) सामोरे जावे लागू शकते असा इशारा अमेरिकेतील एका प्रख्यात कॅन्सररोग तज्ञाने दिला आहे. जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, वृद्ध होणारी लोकसंख्या आणि भारतीय लोकांचे खराब राहणीमान यासाठी कारणीभूत ठरणार आहे. ही त्सुनामी रोखण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतात ज्याप्रकारे गंभीर आजार वाढत आहेत, हे पाहता त्यांना रोखण्यासाठी याच्या प्रतिबंधावर आणि उपचारावर वेगाने काम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. भारताला कॅन्सरच्या लसी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि डाटा डिजिटल तंत्रज्ञानाच्या विस्ताराला अत्याधुनिक स्वरुप देणे गरजेचे असल्याचे उद्गार अमेरिकेच्या ओहियो येथील क्लीवलँड क्लीनिकच्या हेमेटोलॉजी अँड मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जामे अब्राहम यांनी काढले आहेत.
डिजिटल तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान आणि टेलिहेल्थ यासारखी तंत्रज्ञाने रुग्ण आणि तज्ञांमधील अंतर कमी करू शकतात, या तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्गम भागातील रुग्ण महानगरांमध्ये कार्यरत डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आणि सल्ला घेऊ शकतात.
भारतातील स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात 2020-22 दरम्यान अनुमानित कर्करोगाचे रुग्ण आणि यामुळे होणाऱया मृत्यूदरात वृद्धी झाल्याचे मागील महिन्यात सांगितले होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमानुसार 2020 मध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कर्करोगाची रुग्णसंख्या 2020 मध्ये 13 लाख 92 हजार 179 होती. 2021 मध्ये हा आकडा वाढून 14 लाख 26 हजार 447 झाली. 2020 मध्ये रुग्णसंख्या अधिक वाढत 14 लाख 61 हजार 427 वर पोहोचली आहे. 2020 साली भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे अनुमानित प्रमाण 7,70,230 इतके होते. 2021 मध्ये हा आकडा वाढून 7,89,202 झाला. 2022 साली हे प्रमाण वाढून 8,08,558 झाले होते.
अहवालाची आकडेवारी
भारताच्या फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि ब्रिटनच्या अर्न्स्ट अँड यंग एजेन्सीचे अध्ययन ‘कॉल फॉर ऍक्शन ः मेकिंग क्वालिटी कॅन्सर केअर मोर ऍक्सेसिबल अँड अफॉर्डेबल इन इंडिया’नुसार भारतात कॅन्सरच्या रुग्णांची खरी संख्या नोंदले गेलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत तीनपट अधिक असू शकते. कारण 51 टक्के रुग्णांना कॅन्सरचे निदान करण्यास एक आठवडय़ापेक्षा अधिक कालावधी लागतो .तर 46 टक्के रुग्णांमध्ये प्रारंभिक निदान आणि सुचविण्यात आलेल्या उपचारावर विश्वास नसल्याने ते सेकंड ओपिनियन घेत असतात. भारतात 2022 मध्ये 19-20 लाख कर्करोगाचे रुग्ण नोंदले गेले होते, तर प्रत्यक्षात हे प्रमाण 3 पट अधिक असण्याची शक्यता आहे. भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने कॅन्सर रुग्णांच्या संख्येप्रकरणी चीन आणि अमेरिकेनंतर भारताला तिसऱया क्रमांकावर ठेवले आहे.
भारतातील स्थिती
मागील काही वर्षांच्या आकडेवारीनुसार भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कॅन्सर होत असतो. तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. भारतात 2018 मध्ये स्तनाच्या कॅन्सरमुळे 87 हजार महिलांना जीव गमवावा लागला होता. भारतात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होतात. याचे कारण तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान आहे. तसेच स्थुलत्व देखील कर्करोग वाढण्याचे कारण आहे. शरीरात फॅट झाल्यावर कर्करोगाच्या पेशी वेगाने वाढतात.