दोन कोटीच्या डाळीची 19 लाखात विल्हेवाट : दहा टन साखरेसाठी मिळाले 1. 62 लाख,कोरोना काळातील सरकारी बेपर्वाईचा परिणाम
प्रतिनिधी /पणजी
कोरोनाकाळात लोकांना स्वस्तात देण्यासाठी म्हणून खरेदी केलेल्या व वितरणातील गचाळपणामुळे नागरी पुरवठा खात्याच्या गळ्यात पडलेल्या सुमारे 421 टन तुरडाळीची विल्हेवाट लावण्यात अखेर खात्याला यश आले आहे. मात्र या व्यवहारात खात्याने ’लाखाचे बारा हजार’ केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल 2 कोटी रुपयांना खरेदी केलेली तूरडाळ कवडीमोल म्हणता येईल अशा केवळ 19.62 लाख रुपयांना विकण्यात आली आहे.
कोरोना महामारी काळात देशभरात लॉकडाऊन सुरू असताना अनेक ठिकाणी कडधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व काळाबाजार सुरू झाला होता. त्यावर उपाय म्हणून नागरी पुरवठा खात्याने तांदूळ, साखर, गहू, तेल आदींसह नॅशनल ऍग्रीकल्चरल को-ऑप मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि. (नाफेड) कडून सुमारे 400 टन तूरडाळ खरेदी केली होती.
ग्राहकांनी खरेदी न केल्याने सडली तूरडाळ
ही तूरडाळ सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात आली होती. परंतु तब्बल 120 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यास म्हणावे तसे ग्राहक पुढे आलेच नाही. परिणामी निम्म्याहून अधिक डाळ दुकानांतच पडून राहिली. नंतर काही दिवसांनी दुकानदारांनी ती डाळ खात्याला परत केली. त्यातून अंदाजे दोन कोटींचा फटका बसला. आता तिची कवडीमोलाने म्हणजे 19.62 लाख रुपयांना विल्हेवाट लावण्यात आली आहे.
दोन वर्षे डाळ गोदामात पडून
शिल्लक राहिलेली सुमारे 242 टन डाळ तब्बल दोन वर्षे खात्याच्या गोदामात पडून राहिली व अखेरीस सडून तिची नासाडी झाली. मध्यंतरी एकदा खात्याने सदर डाळीची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्नही केले. त्यासाठी 2021 मध्ये निवादा जारी केली. परंतु एकही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर वर्षभरानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा निविदा जारी केल्या.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश
डाळीसोबत अन्य काही कडधान्यांचीही नासाडी झाल्याचे उघडकीस आले. त्यात साखरेचाही समावेश होता. हा गैरकारभार उघडकीस आला तेव्हा राज्यभरातून सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन प्रचंड टीका झाली. त्यातून मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेत दक्षता खात्यामार्फत त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. याचा परिणाम म्हणून खात्याचे माजी संचालक सिद्धीविनायक नाईक यांना निलंबितही करण्यात आले.
ऑगस्टमध्ये पुन्हा जारी निविदा
दरम्यान, ऑगस्टमध्ये जारी करण्यात आलेल्या निविदेस प्रतिसाद म्हणून सहा कंत्राटदार पुढे आले. त्यातील कोल्हापूर येथील दोघांनी साखर खरेदीसाठी निविदा भरली तर उर्वरित चौघांनी तूरडाळ खरेदीची तयारी दर्शविली, त्यातील तिघे कर्नाटकमधील आणि हरियाणामधील एका कंत्राटाराचा समावेश होता.
साखरेसाठी निविदा भरलेल्यामधील मे. देसाई कटलरीज या कंत्राटदाराने 10 टन साखरेसाठी 1.62 लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे त्याची निविदा मंजूर करण्यात आली. डाळीसाठी हरियाणा येथील मे. सर्वती फूडस् प्रा. लि. या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. त्यांनी 18.43 लाख रुपयांना तूरडाळ खरेदी केली.