भारतीय पथकाची बचावकार्यात आघाडी ः 5 दिवस ढिगाऱयाखाली दबलेल्या मुलीची सुटका ः 106 जणांवर उपचार
अंकारा / वृत्तसंस्था
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत असून ती आता 25 हजारांसमीप पोहोचली आहे. आतापर्यंत 24 हजार 165 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा 78 हजारांच्या पुढे गेला आहे. एकटय़ा तुर्कस्तानमध्ये 20,665 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर, सीरियामध्ये 3,500 लोकांचा बळी गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान, भारतीय पथकाने मदत व बचावकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवत त्यात आघाडी घेतली आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भूकंपाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सांगितले. बऱयाच देशांकडून मदत प्राप्त होत असून त्याचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारतीय पथक तुर्कस्तान आणि सीरियाला मदत करत आहे. 10 फेब्रुवारी रोजी, नुरदगी शहरातील एका वर्षाच्या मुलीला भारतीय लष्कराच्या पथकाने पाच दिवसांनंतर ढिगाऱयातून जिवंत बाहेर काढले. यासोबतच तुर्कस्तानच्या हाते प्रांतात उभारण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये लोकांवर सातत्याने उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 106 लोकांना येथे दाखल करण्यात आले आहे.
भूकंपग्रस्त प्रदेशामध्ये सध्या भारतीय लोक अडकल्याची कोणतीही माहिती नाही. तुर्कस्तानमध्ये सुमारे 3,000 भारतीय असले तरी त्यातील बहुतांश लोक भूकंपग्रस्त भागात राहत नाहीत. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत, असे तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत विरेंद्र पॉल यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच एक भारतीय बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यासंबंधी अधिक माहिती सध्यातरी देण्यात आलेली नाही.