अन्य तिघा गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार : वळणावर गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात
प्रतिनिधी /वाळपई
गोवा ते बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट रस्त्यात गुरुवारी रात्री बेळगावहून गोव्याकडे येणारी कार वळणावर दरीत कोसळल्यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
ही कारगाडी बेळगावहून गोव्यात येत होती. गोवा हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर एका धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दरीत कोसळली. यामध्ये नूर तनुद्दीन शेख (36 वर्षे) व सुधीर आत्माराम परब (36 वर्षे) हे दोघेही ठार झाले असून ते दोघेही राहणारे पालघर, महाराष्ट्र येथील होते. कारमधील विनोदकुमार कनहाट, संतोष भवर, ऍड्री फर्नांडिस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
या संदर्भात अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सांखळी सरकारी इस्पितळात हलविण्यात आले. सदर ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. वाळपई पोलिसांना या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी सर्वेश गड्डी यांनी कर्मचाऱयांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविले. वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकांत गावकर, रामा नाईक, महादेव गावडे, सुधाकर गावकर, यांनी जखमीना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.