ऑनलाईन टीम/तरुण भारत
नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांना आयटीआयमधून प्रशिक्षण देण्याचा निर्णय विभागामार्फत घेतला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नक्षलग्रस्त जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात २ नवीन आयटीआय सुरु करण्यात येत असून यामध्ये नक्षलग्रस्त शरणार्थी किंवा त्यांच्या पाल्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादातून शरण आलेल्या आणि आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींसाठी या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी गुणांकनाची कोणतीही अट असणार नाही, अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे केली.
गोंदिया जिल्ह्यात पालांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन नवीन आयटीआय यासाठी सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी प्रवेश सत्र २०२२ पासून सुरु करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून त्यांना संस्थास्तरावर प्रवेशाची संधी मिळणार आहे.