लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्रांतीनगर कुसगाव येथून शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या चार तासात शोध घेऊन त्यांना सुखरूप ताब्यात घेण्यात लोणावळा आणि उस्मानाबाद पोलिसांना यश आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.03) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या बेपत्ता मुलींच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार यांच्या अनुक्रमे 13 आणि 12 वर्ष वयाच्या दोन मुली राहत्या घरातून सकाळी 7:30 वाजता कन्या विद्यालय भांगरवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे येथे नेहमीप्रमाणे गेल्या होत्या. परंतु दुपारी 02 वाजेपर्यत त्या घरी न आल्याने शाळेत चौकशी केली असता त्या शाळेत आल्याच नसल्याचे समजले. वडिलांनी व नातेवाईकांनी मुलींचा आसपास परिसरात शोध घेतला. परंतु त्या मिळुन न आल्याने फिर्यादीने रात्री 9 वाजता लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस पथकं तात्काळ तपासासाठी रवाना करण्यात आली.
अधिक वाचा : ‘मविआ’ला दणका; राज्यपाल नियुक्त आमदारांची ‘ती’ यादी अखेर रद्द
तपासादरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांना या दोन्ही मुली सायंकाळी 5:15 वा. च्या दरम्याण पुणे रेल्वे स्टेशन येथे दिसल्याची माहिती मिळाली. तेथील सीसीटिव्हींची पाहणी केली असता त्या मुली पनवेल-नांदेड या रेल्वेने नांदेडकडे जात असल्याची माहिती मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ ही माहिती उस्मानाबाद अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना कळवली. त्यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्यरात्री 12:30 वा. च्या सुमारास उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे पोलीस रवाना केले. रेल्वे उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे येताच पोलिसांनी दोन्ही मुलीचा शोध घेवून दोघींना 12:55 वाजण्याच्या सुमारास सुखरुप ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी उस्मानाबादमधून या दोन्ही मुलींचा ताबा घेतला. त्या मुली सुखरुप आहेत.