संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री जपान दौऱयावर रवाना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बुधवारी तीन दिवसांच्या जपान दौऱयावर रवाना झाले. दोघेही 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान जपानमध्ये असतील. येथे ते संरक्षणमंत्री यासुकाझू हमादा आणि परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी यांच्याशी चर्चा करतील. या दौऱयात दोन्ही देशांचे प्रतिनिधी द्विपक्षीय भागिदारी मजबूत करण्यासाठी नवीन मार्ग निश्चित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
भारतीय मंत्रीमहोदयांच्या जपान भेटीमध्ये दोन्ही देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा करू शकतात. भारतीय प्रशांत महासागरात चीनची आक्रमकता वाढत आहे. अलीकडेच, चीनने तैवानजवळ अभूतपूर्व प्रक्षोभक लष्करी सराव केला. अशा परिस्थितीत दोन्ही देश चीनला धडा शिकवण्याच्या मार्गावरही विचार करू शकतात. यापूर्वी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारत दौऱयावर आले होते. शिखर परिषदेत किशिदा यांनी पुढील पाच वर्षांत भारतात 3 लाख 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते.
भारत-जपान यांनी यापूर्वी 2018 मध्ये ‘टू प्लस टू’ संवाद आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी टोकियो, जपान येथे 13 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत हा निर्णय घेतला. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्ली येथे प्रथमच दोन्ही देशांमधील परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय संवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारताने 2019 मध्ये जपानसोबत ‘टू प्लस टू’ संवाद सुरू केला. सध्या अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया या काही निवडक देशांसोबतच भारत ‘टू प्लस टू’ संवाद आयोजित करत आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ‘टू प्लस टू’ चर्चेसाठी 5 दिवसांच्या अमेरिका दौऱयावर गेले होते. दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. यादरम्यान संरक्षण सहकार्यासह अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती.