पंचक्रोशीत हळहळ
वाकरे / प्रतिनिधी
भामटे (ता. करवीर) येथे गायरान वसाहतीत असलेल्या गावतळ्यात म्हशी धुताना दोन शाळकरी सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.समर्थ महादेव पाटील (वय ९) व राजवीर महादेव पाटील ( वय ८) अशी या बालकांची नावे आहेत.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, या लहान मुलांच्या आजी शांताबाई राजाराम पाटील या दररोज कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या दक्षिणेला असणाऱ्या वाघजाई डोंगरावर म्हैशी चरायला घेऊन जातात. जनावरे परत घेऊन येत असताना गायरान वसाहतीत असणाऱ्या गावतळ्यात त्या जनावरे पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी सोडतात. आज शाळेला सुट्टी असल्याने राजवीर आणि समर्थ हे आजीसोबत जनावरे घेऊन डोंगरात गेले होते. परत येत असताना म्हैशी या गावतळ्यात पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी सोडल्या आणि आजी घरी गेल्या.
दरम्यान, ही दोन लहान मुले म्हैशीसोबत तलावात गेल्यानंतर पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाली. म्हशींना नेण्यासाठी आजी परत आल्या असता त्यांना ही मुले दिसली नाहीत.त्यांना तळ्याच्या काठावर या लहान मुलांची कपडे आणि चपला दिसल्या. त्या लहान मुले घरी आले असतील म्हणून परत घराकडे आल्या, तर घरात ही मुले नसल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गाव तलावात शोध घेतला असता ही मुले बुडून गंभीर जखमी असल्याचे निदर्शनास आले. यातील एक शाळकरी मुलाची हालचाल सुरू होती. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या लहान मुलांचे वडिल व चुलते कुंभी कासारी कारखान्यांमध्ये स्वतःच्या बैलगाडीवर ऊस तोडणी कामगार म्हणून काम करतात. त्यामुळे या कष्टकरी कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.