शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळवली मान्यता
प्रतिनिधी / पणजी
गोव्याच्या इतिहासात प्रथमच दोन महिला विद्यार्थिनींनी भारतीय न्यायशास्त्र परंपरा हे शिक्षण पूर्ण करून शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडून मान्यता मिळविली. कल्याणी तन्मय हर्डिकर-माशेल आणि ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी यांचा समावेश आहे. दोघांनीही रिवण व काणकोण येथे शिक्षण घेतलेले आहे.
आतापर्यंत धर्मशास्त्र शिक्षणात न्याय मिमांसा पर्यंतचे शिक्षण हे पुरुषांनीच घेतलेले होते. मात्र आता हे शिक्षण महिलांनीही संपादन केले. माशेलच्या भार्गवी कालिदास सावईकर व आताच्या तन्मय हर्डिकर यांनी काणकोणच्या पंडित दत्तभार्गव टेंगसे यांच्याकडे त्यांच्या वाग्वर्धिनी पाठशाळेमध्ये घेतले. दुसरी विद्यार्थिंनी ही ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी ही मूळ परभणी महाराष्ट्र येथील असून तिने रिवण येथील श्री विद्या वेदपाठशाळेत अध्यापन पूर्ण केले. याचबरोबर मूळ उडपी कर्नाटक येथील सुब्रह्मण्यम मंजुनाथ होळ्ळा यांनी श्री विद्या पाठशाळा रिवण येथे 6 वर्षांच्या न्यायशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला व शंकराचार्य यांनी घेतलेल्या महापरीक्षेत ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण ठरले.
तर गोव्याचे वे. शा. संपन्न व महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांचे चिरंजीव प्रियव्रत देवदत्त पाटील यांनी व्याकरणशास्त्र अध्यय आपले वडील देवदत्त पाटील यांच्या रिवण येथील पाठशाळेत पूर्ण केले व शंकराचार्यानी घेतलेल्या महापरीक्षेत ते अति विशेष श्रेणीत उत्तीर्ण ठरले.
न्याय परीक्षेत उत्तीर्ण होणे हे तसे सोपे नसते. सलग 6 वर्षे शिक्षण असते तसेच न्याय वेदान्त व्याकरण मिमांसा आणि गणित या विषयावरील शिक्षण गुरुंच्या सान्निध्यात राहून पूर्णवेळ प्रशिक्षण घ्यायचे असते. दर 6 महिन्याला परीक्षा असतात. 6 वर्षात प्रत्येक विषयावर 14 परीक्षा देणे आवश्यक असते. परीक्षा या लेखी आणि मौखिक स्वरुपाच्या देखील असतात. त्यामध्ये 19 ग्रंथ, व्याकरण मध्ये 8 ग्रंथ, मिमांसा मध्ये 9, वेदांतमध्ये 12, गणितात 13 ग्रंथांचा सखोल अभ्यास गुरुंच्या सान्निध्यात राहून करायचा असतो. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची महापरीक्षा शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वतः मौखिक स्वरुपाची परीक्षा घेतात त्याला महापरीक्षा असे म्हणतात.
अगोदर दत्त देवस्थान अहमदनगर या संस्थेने परीक्षा घेतल्या होत्या. त्यात हे गोव्यातून गेलेले 4 ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 2013 पासून हे सर्वजण परीक्षा देत होते. अलिकडेच दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्री विधुशेखर भारती यांनी महापरीक्षा घेतली. त्यात हे चारही विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण ठरले. या सर्वांनाच वेदमूर्ती देवदत्त पाटील यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त झाले होते.