लोणावळा : पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईमधील दोन पर्यटकांचा आज पवना धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास फांगणे वसाहत भागात ही दुर्घटना घडली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभादेवी, वरळी मुंबई येथील सक्सेना परिवार व त्यांच्या मुलांचे मित्र असे सात जण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. ते सर्वजण पाण्यात उतरले मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यापैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. आर्या दीपक जैन (वय 13 वर्ष) व समिर कुलदीप सक्सेना (वय 43 वर्ष) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर पायल समीर सक्सेना (वय 42), लक्ष सक्सेना (वय 14), यश सक्सेना (वय 8), आदी चुगानी, (वय 14), व अंश सूरी (वय 14) या पाच जणांना वाचविण्यासाठी यश आले आहे.
अधिक वाचा; Pune : चांदणी चौकातील पूल येत्या 2-3 दिवसात पाडणार
फांगणे गावाजवळ पवना धरणात काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणच्या पवनानगर बीटचे पोलीस हवालदार रफिक शेख व विजय गाले यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट दिली. स्थानिकांच्या मदतीने या पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले. पण त्या सात जणांमधील आर्या दीपक जैन व समीर कुलदीप सक्सेना हे दोघे मयत झाले होते तर बाकी सर्वांना वाचविण्यात यश आले. ऐन गणेशोत्सवात ही दुदैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मागील तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.