वार्ताहर /उचगाव
उचगाव ते बेकिनकेरे या कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पावसाळय़ात चिखल तर उन्हाळय़ात धूळ उडत असल्याने या मार्गावरीला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार या मार्गावरून ये-जा करणाऱया प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ? असा संतापजनक प्रश्न जनतेतून केला जात आहे.
उचगावपासून महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा हा पाच किलोमीटरचा रस्ता तसेच बसुर्ते-बेकिनकेरे या पट्टय़ातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता उखडला असून, खडी विखुरलेली दिसून येत आहे. रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. संपूर्ण खडी, त्यात टाकलेली माती यामुळे वाहनांच्या वेगाने संपूर्ण धुळीचे लोळ सर्वत्र पसरत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भात व इतर पिकावरही धूळ बसून मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱयातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून ये जा करणे मुश्कील झाले आहे. मोठ-मोठे खड्डे आणि विखुरलेली खडी यामुळे दुचाकीस्वार घसरुन पडून अपघात घडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या भागाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने सदर रस्त्याचे डांबरीकरण करून, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर रास्तारोको आंदोलन छेडले जाईल व लोकप्रतिनिधींना घेराव घातला जाईल असा इशारा प्रवासी आणि नागरिकांतून देण्यात आला आहे.