वार्ताहर /उचगाव
उचगाव गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करून या गावाचा विकास साधणार असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. उचगाव ग्राम पंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहिती याप्रसंगी बोलताना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार हे होते.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या परिसराचा विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येक गावाला भेट देवून त्यांनी समस्या समजावून घेतल्या आहेत. उचगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच मध्यवर्ती गांधी चौक व मारुती चौकामध्ये हायमास्ट लाईट बसविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच त्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य निळकंठ कुरबूर यांनी शिवारातील साखळी रस्ते करावेत, याचबरोबर रोजगार हमी योजना ही शेतामध्ये राबविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे केली.
यावेळी उपाध्यक्षा मथुरा तेरसे, बंटी पावशे, यादो कांबळे, बाळकृष्ण तेरसे, मोनाप्पा पाटील, योगिता देसाई, रूपा गोंधळी, भारती जाधव यांच्यासह इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.