जर मी उत्तर दिलं नाही तर राजकारणातून निवृत्ती घेईन; उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीकाकारांना उत्तर
प्रतिनिधी/रत्नागिरी
पुणे इथे झालेल्या हल्ल्यावरून उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी यावेळी आव्हान दिलं आहे. ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला, पुढच्या १५ दिवसांत त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे. कोणाच्यात दम आहे त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावा असं आव्हान उदय सामंत यांनी दिलं आहे.
माझ्यावर झालेली सर्व टीका डोक्यात ठेवली आहे, एप्रिल २०२४ ला याचं उत्तर देणार आहे. आणि ते जर मी दिलं नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेईन, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.
हे ही वाचा : आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि… , फडणवीसांचा ठाकरेंना टोला
रत्नागिरीत दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन्ही गटात आरोप- प्रत्यारोप, टीका सुरू आहेत. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी देखील यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले रत्नागिरीचे आमदार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली होती. उदय सामंत यांनी मात्र संयमीपणे प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र शुकवारी रत्नागिरीत दहीहंडी कार्यकमापसंगी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गर्भित इशारा देत खासदार विनायक राऊत यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे.