सातारा: सातारकरांची जीवनदायी ठरलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. धरणातील पाण्याची क्षमता 0.1 टिएमसी वरुन 0.5 टिएमसीपर्यंत वाढली आहे. पूर्णतः गुरुत्वाकर्षण पध्दतीने उपलब्ध होणा-या पाण्याचा वाढणारा दाब लक्षात घेता,सध्याच्या कास बंदिस्त पाईपलाईनच्या सुधारणेकरीता सातारा नगरपरिषदेने अमृत 2.0 योजनेमधुन सुमारे 87 कोटी 21 लाख रुपयांच्या प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजूरी दयावी अशी आग्रही मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचेकडे केली. सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी देऊन कार्यवाही जलद करण्यात येईल असा शब्द हरदीप सिंह पुरी यांनी उदयनराजे यांना दिला.आज नवी दिल्ली, निर्माण भवन येथील गृहनिर्माण व नगर मंत्रालयात पुरी यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली.
नगरपरिषदेच्या कास बंदीस्त पाईपलाईनची सुधारणा व अनुषंगीक कामांचा सुमारे 87 कोटी 21 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देणेबाबत निवेदन दिल्यावर जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, पाणी उचलण्याचा किंवा वाहुन नेण्याकरीता (लिफटींग व पंपिंग ) कोणताही खर्च नसलेल्या कास धरणामधुन गुरुत्वाकर्षण पध्दतीने (ग्रव्हीटी) आज रोजी 15 गावांसह सातारच्या निम्या भागाला पाणीपुरवठा होत आहे. अलीकडच्या सुमारे 25 वर्षापर्यंत कास धरणातुन उघडया पाटाने पाणी येत होते. उघडया पाटामुळे पाणी जमिनीत मुरणे, पाट फुटणे, पाट-पाण्यात कचरा मिसळणे, इत्यादी प्रकार होत असत.त्याला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम 1996-97 च्या दरम्यान, कृष्णा खारे विकास महामंडळाचे आम्ही उपाध्यक्ष असताना, कास बंदिस्त पाईपलाईनचे काम हाती घेवून मार्गी लावले. त्यामुळे पाण्याचा अधिक शुध्द व वाढीव पुरवठा उपलब्ध झाला.
कास धरणातुन नैसर्गिकरित्या पाणी येत असल्याने, त्यास कोणताही खर्च नाही म्हणून कास धरणाची उंची वाढवल्यास सातारकरांना कायमस्वरुपी बिनखर्चांचे पाणी उपलब्ध होईल हे लक्षात घेवून कास धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आज रोजी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उंची वाढवल्याने धरणातील पाणी साठी 0.1 टिएमसी वरुन, 0.5 टिएमसीपर्यंत वाढले आहे. धरणातुन येणा-या पाण्याचा दाब देखिल वाढला आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा करण्याचा सुमारे 87 कोटी 21 लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्राच्या अमृत 2.0 मधुन केंद्राच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाला सादर केला आहे.
सादर केलेल्या प्रस्तावामध्ये कास बंदिस्त पाईपलाईन सुधारणा करणे, फिल्टरेशन प्लॅन्टची क्षमता वाढवणे, नवीन फिल्टरेशन टॅन्क साकारणे, नवीन साठवण क्षमता, आदी कामांचा समावेश आहे. या कामामुळे कास मार्गावरील 15 गावांसह सध्याच्या अर्धे शहर भागाऐवजी संपूर्ण सातारा शहराला कासचे पाणी ग्रव्हीटीव्दारे बिनखर्चाचे उपलब्ध होणार आहे. कार्बन फुटप्रिंट कमी होण्याबरोबरच वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयांच्या सध्याच्या होत असलेला पाणीपुरवठा वीज बिल खर्च वाचणार आहे. दरडोई पुरेशा दाबाने आवश्यक असणारे शुध्द पिण्याचे पाणी पुरवता येणार आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान केली जावी अशी आग्रही मागणी आहे केली.
भेटीदरम्यान हरदीप सिंह पुरी यांनी या लोकोपयोगी सुधारणा कामास अमृत 2.0 मधुन प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत त्यांच्या मंत्रालयातील अधिका-यांना पाचारण करुन जरुर त्या सूचना दिल्या आहेत. परिपूर्ण प्रस्ताव असल्याने लवकरच प्रशासकीय मंजूरी मिळून, कास बंदिस्त पाईपलाईनच्या सुधारणेच्या आणि त्या अनुषंगाने अन्य कामांना सुरुवात करण्यात येईल असेही ते म्हणाले.
Previous Articleरावसाहेब दानवे धोकेबाज राजकारणी
Next Article आई जगायला हवी…
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.