ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या संदर्भांत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा सर्व स्थरातून निषध केला जात आहे. आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सुद्धा यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dy cm devendra fadnavis) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भांत पत्रकार परिषद घेत राज्यपाल, सुंधाशू त्रिवेदींवर कडाडून प्रहार केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. कोश्यारी, त्रिवेदी यांच्या याच विधानानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. “भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे आदर्श आहेत हे वाक्य जेव्हा मी राज्यपालांच्या तोंडून ऐकलं तेव्हा कक्षणभर मला काही समजलेच नाही. मग माझ्या मनात प्रश्न आला की राज्यपाल कोश्यारी यांनी जे वक्तव्य केले त्याला आधार काय? जेव्हा भारतावर मुघलांचे राज्य होते त्यावेळी देशभरातील अनेक राजे मुघलांना शरण गेले पण फक्त शिवाजी महाराजांनी जनतेला सन्मान मिळवून देण्यासाठी आणि जनतेवरचा अन्याय दूर कारण्यासाठी मुघलांना विरोध केला. जनतेच्या हिताचा विचार उराशी धरून शिवाजी महाराजांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले आणि राज्यपाल म्हणतात की शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले असं राज्यपाल म्हणतात.
उदयनराजे भोसले यांनी भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. पुढील भूमिका त्यांनी २८ नोव्हेंबर रोजी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे पुढे म्हणाले की, विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो. उदयनराजे यांनी राज्यपाल विचार जुना झाल्याचे म्हणत असताना व्यासपीठावर असलेल्यांनी आक्षेप का घेतला नाही? शिवरायांचा अपमान होत असताना गप्प का बसता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अनेक देशात योद्धे होऊन गेले पण त्यांनी आपल्या लढाया आपल्या साम्राज्यासाठी केल्या, पण शिवरायांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लढाया केल्या. आधुनिक भारताची संकल्पना त्यांनी त्यावेळीच मांडली. शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली? त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? हे सर्व वेदनादायी असून अशा वक्तव्यांनी चीड येते. शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची मांडणी त्यांनी केली. धर्मस्थळांचा त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे म्हणाले.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
राज्यात आल्यापासून वादाची माळ लावून सोडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले.