राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबात लवकर तोडगा काढण्याची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
एखादा व्यक्ती वादग्रस्त बोलतो म्हणून त्याचा पक्ष चुकीचा आहे असे समजणे गैर आहे. त्यास पक्ष जबाबदार नसतो तर ती व्यक्ती जबाबदार असते. परंतु त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर योग्य नाही. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे, असे प्रखर मत खासदार उदयनराजे यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रपतींकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्याने आल्याचे त्यांनी सांगितले. महाजन आयोगाचे अंमलबजावणी केली असता तर आज कर्नाटक-बेळगाव सिमावाद झाला नसता, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेते मंडळीकडून सातत्याने महापुरुषांच्याबाबत वक्तव्य होत असल्याने खासदार उदयनराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शिवसन्मान निर्धार आंदोलनाचा जी रुपरेषा ठरवली होती. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याबाबत दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, आज भाजपाचे राज्यसभेच्या सदस्यांना मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या तीन राज्यातून 26 खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले होते. उर्वरित राज्यातील खासदारांना पुन्हा निमंत्रित करणार असतील. सर्वांना माहिती आहे की 23 नोव्हेबरलाच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि अमित शहांना पत्र लिहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्याबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. राष्ट्रपतींच्या सेक्रेटरीनी होममिनिटस्टरला पत्र पाठवले आहे. मोदींच्या कार्यालयात पत्र पाठवले होते. त्यांच्याकडून कार्यवाही सुरु आहे. एखादा कुठलाही विषय वाढू नये, त्या त्या राज्यात तेढ निर्माण होऊ नये ही त्या मागची भावना आहे. छ. शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबाबत प्रत्येकाने मोजून मापून खासकरुन विधान केले गेले. राज्यपाल हे पद मोठे आहे. देशातले सर्वात मोठे पद हे राष्ट्रपती आहे. राज्यातले मोठे पद राज्यपाल आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही फाटाफुट होऊ नये, मोदींकडे मांडणी केली आहे. आता त्यांच्याकडून कार्यवाही होईल अशी खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.
नाराज शिवभक्त 17 तारखेला आंदोलन करतील
उदयनराजे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे शेडय़ुल होते त्यानुसार आम्ही बैठकीत पोहोचलो. त्यांच्याकडून जे काय मिळेल तशी मांडणी करणार आहे. पत्रकारांनी प्रश्न छेडल्यावर उदयनराजे म्हणाले, मला तर खात्री आहे हा कुठल्या आघाडीचा विषय नाही. जे शिवभक्त नाराज आहेत ते 17 तारखेला आंदोलन करतील. मी व्यक्तीशः स्वत जे करायचे ते केले. जे जे महापूरुष आहेत त्यांच्याबाबत असे घडत राहिले तर खूप चिंतनीय बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाची चुकी नसते, बोलणारी व्यक्ती चुकते
ऑलरेडी त्यांची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आज देशाचा कार्यभार पाहताना पंतप्रधान पद मोठे आहे. देशाच्या वेगवेगळय़ा तपास एजन्सी आहेत त्यांना याची तीव्रता माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला असणार आहे. हे माझे एकटय़ाचे मत नाही. मध्यप्रदेशात सुद्धा मोठय़ा प्रमाणात मराठा समाज सुद्धा आहे. तिथे जे काय बोलणं झाले ते मांडता येणार नाही. जी व्यक्ती बोलली त्या व्यक्तीची चुकी असते, पक्षाची चुकी नसते. भाजपा त्या व्यक्तीला सांगत नाही तसे बोला म्हणून असे कारवाई व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत आस्था आहे म्हणूनच मी माझ्यापरीने प्रयत्न करतो आहे, याची कारवाई मागेच व्हायला हवी होती. आता सुद्धा प्रोसिजर करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तर सिमावाद निर्माण झालाच नसता
बेळगाव, धारवाड, निपाणी येथील मराठी भाषिक वादाबाबत पत्रकारांनी छेडले असता सिमावादाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी महाजन कमिटी नेमली होती. त्या कमिटीच्या अहवालानुसार भाषावर रचना केली नाही. दैनदिन जीवनात सुद्धा केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला बोलवून भाषावर विभाग द्यावा तरच प्रश्न सुटणार आहे, असेही त्यांनी मत व्यक्त केले.