ऑनलाईन टीम/ तरुण भारत
शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष (Santosh Bangar)बांगर यांना जिल्हाच्या प्रमुख पदावरुन हटवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे. बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. २००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते.
संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोली शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत थेट उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना आपण दिले ते सोडून गेले ज्यांनी आपल्याला दिलं ते सोबत आहेत, असे बोलत ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता सर्वांना भेटायला मी येणार आहे. असे आश्वासन यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलं होतं.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सेनेतील अनेक आमदार त्यांच्यासोबत गेल्यानंतर संतोष बांगर ढसाढसा रडले होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी रडलेही होते. त्या नंतर बांगर अवघ्या काही तासात शिंदे गटात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बांगर त्यांच्यासोबत कसे आले याचा किस्सा सांगितला होता.