विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान : न्यायासाठीचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेची याचिका फेटाळल्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकमेकांच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका बुधवार, 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावत एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा दिला होता. हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना (युबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांचे सदस्यत्व कायम ठेवतानाच उद्धव गटातील 14 आमदारांनाही पात्र ठरवले होते. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकर निकालपत्र जाहीर करताना म्हणाले होते. यापूर्वी निवडणूक आयोगानेही हे मान्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत आपल्याकडे बहुमत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेना (युबीटी) नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. या निर्णयानंतर सभापतींचा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे आमचा लढा सुरूच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिलेल्या निर्णयात भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. मात्र, नार्वेकर यांनी त्यांना योग्य ठरवले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या सर्व प्रकरणांना उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानुसार आता ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावर नजिकच्या काळात सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे.