पुणे / प्रतिनिधी :
उद्धव ठाकरे यांनी चिन्ह आणि पक्षाचे नाव गमावल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात न जाता जनतेच्या न्यायालयात जाऊन बहुमत मिळवावे. निवडणूक आयोगाने लोकशाहीचा आदर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना चिन्ह आणि नाव दिलेले आहे. गुणवत्तेच्या आधारे हा निकाल निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला असुन उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले तरी काही उपयोग होणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली आणि आता स्वतःच्या पक्षाचे नाव, चिन्ह गमावून बसण्याची वेळ त्यांच्या वेळ आलेली आहे भाजपसोबत ते सत्ता स्थापन करून राहिले असते तर ही वेळ टळू शकले असते कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुका या बिनविरोध झाल्या पाहिजे होत्या यासाठी मी सर्व पक्षांची बोलणी करत होतो एखाद्या परिवारातील लोकप्रतिनिधी गेल्यानंतर सदर ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी नैतिक परंपरा राज्यात होती पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याने प्रचारात येऊ शकत नव्हते मात्र विरोधकांनी त्याबाबत त्यांचा विरोध असल्याची अफवा पसरवली होती त्यामुळे बापट आजारी असतानाही त्यांना प्रचारात आणावे लागले.
भारत जोडो ऐवजी काँग्रेस जोडो गरजेचे
नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर दरम्यान पायी भारत जोडो यात्रा काढली त्याचा परिणाम कितपत झाला? या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले, काँग्रेस सध्या देशात-राज्यात टिकलेली नाही, अमेठी मधून राहुल गांधी पराभूत झालेले आहे, विरोधी पक्षनेते पदही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रा काढण्यापेक्षा त्यांनी काँग्रेस जोडो अभियान राबवणे गरजेचे होते. त्यामुळे भारत जोडोचा परिणाम दिसून येत नाही. काँग्रेसने इतक्या वर्षात भारत जोडला नाही का? हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देश चांगल्याप्रकारे जोडलेला आहे. राहुल गांधी केंद्रात सत्तेत येण्याची कोणतेही चिन्ह नाही. कारण, देशात सर्वोच्च स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले असून त्यांचा करिष्मा देशभरात दिसून येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.