अमित शहा यांचा घणाघाती प्रहार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ‘मिशन 150
प्रतिनिधी/ मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मते मागून जागा जिंकून येताच उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. या विश्वासघातामुळे त्यांचा पक्ष छोटा झाला, त्यासाठी तेच जबाबदार आहेत, असा घणाघाती प्रहार उद्धव ठाकरे यांच्यावर करत, पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
मुंबईत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपचे मुंबई महापालिकेचे ‘मिशन 150’ जाहीर केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शहा यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडवला.
रस्त्यावर उतरा
जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमिनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी 2014 मध्ये आपल्यासोबतची युती तोडली, असे शहा म्हणाले, ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटले आपल्याशिवाय भाजपचे काही चालणार नाही. भाजप युती तोडणार नाही. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील. मात्र त्यांचा समज चुकीचा ठरला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही, असा थेट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे, आणि यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरले पाहिजे. महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शिंदे गटाच्या सोबतीने व्यूहरचना
भाजपने 150 जागांचे टार्गेट ठेवले असले तरी शिंदे गटाला सोबत घेऊन व्यूहरचना करण्यात येणार आहे. शिंदे गटाला सोबत घेऊनच महापालिका निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. सोमवारी अमित शाह यांनी देखील 150 जागांचे टार्गेट ठेवले. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.
ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत ः फडणवीस
मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे, असे माना आणि अभी नही तो कभी नही, असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहनही फडणवीसांनी केले.