अध्याय एकोणतिसावा
उद्धवासारखे अनर्घ्य रत्न ब्राह्मणाच्या शापापासून वाचवलेच पाहिजे या हेतूने भगवंतानी त्याला बद्रिकाश्र्रमात पाठवायचे ठरवले. कारण लोकसंग्रह करून जडमूढ जनांना तारण्यासाठी बद्रीकाश्रमासारखे दुसरे स्थान नाही हे त्यांना माहित होते. तेथे ते नित्य अनुष्ठान करत असतात. दुरून जरी त्या ठिकाणाकडे पहिले तरी कलीकाळाचे सुद्धा निर्दालन होते. मग इतर विघ्नांची काय कथा? त्या पर्वताचा स्पर्श माणसाला परमपवित्र करून सोडतो. बद्रीकाश्रमाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, उद्धवा, अलकनंदा माझ्या पायांना स्पर्श करून पुढे येत असल्याने तिच्यात श्र्रद्धायुक्त अंत:करणाने स्नान केले तर जीवाचे भवबंधन म्हणजे संसाराचे बंधन तुटते. जो त्या नदीतील पाण्याने आचमन करील त्याचे पितर उद्धरून जातात. म्हणून माझे बद्रिकाश्र्रम हे स्थान अत्यंत पवित्र आहे. बद्रीकाश्रमाची कथा अशी सांगतात की, रजोगुण वाढल्यामुळे माणसे अत्यंत भोगासक्त झाली होती. त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी सत्वगुणाचे महात्म्य वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी भगवंत तेथे नर आणि नारायण या दोन ऊपात अवतरले. त्याबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले, भक्तांना भजनपूजन करायला मी नारायण अवतार धारण केला तर नररूपाने मीच भक्ताचे अवतार घेतला. म्हणजे पूज्य आणि पूजक अशी दोन्ही रुपे मीच धारण केली. त्यातूनच भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तिन्हीची स्थापना मी तेथे केल्याने सर्व परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. तेथे माझ्या भक्तीचे नंदनवन फोफावले आहे म्हणून या स्थळाला ‘बदरीकाश्र्रम’ असे नाव ठेवले. त्या स्थळी माणसाचा भवभ्रम नष्ट होतो. तेव्हा उद्धवा तू आता बद्रिकाश्र्रमात जावेस हे बरे. कदाचित तुला असे वाटेल मी त्या तीर्थात जाऊन मिळवण्यासारखे काय शिल्लक राहिले आहे? देवाने मला मोक्षानंतरची भक्ती अर्पण केली असल्याने मी कृतकृत्य झालेलो आहे. मग तीर्थक्षेत्री जाऊन वेगळे काय घडणार आहे? त्यामुळे तेथे जाण्यात काहीच गम्य नाही. माणूस तीर्थक्षेत्रात जाऊन देवभक्ती करून त्याचे इप्सित साध्य करून घेतो पण देवांनी ते सर्व मला इथे बसल्याजागीच दिले आहे. मग तिथे जाऊन मला वेगळं असे काय मिळणार आहे? उद्धवाच्या मनात असेच काहीसे भाव उमटले होते. विशेष म्हणजे भगवंत आणि उद्धवाची मने आता एकरूप झालेली असल्याने भगवंतानी उद्धवाच्या मनातील भाव जसेच्या तसे जाणले. भक्त आणि भगवंत एकरूप झाल्याची ती खूणच होती. उद्धवाला आणखी काही बोलण्यास वाव न देता भगवंत त्याला म्हणाले, उद्धवा, तू बद्रिकाश्र्रमात जावे ही माझी आज्ञा समज. बद्रिकाश्रमाचे महत्त्व अपरंपार आहे. थोडक्मयात एव्हढेच सांगतो की, जो नर त्याचे दर्शन घेऊन त्याला श्र्रद्धेने नमन करतो त्याचा नारायण होतो. भगवंतांनी एव्हढे निक्षून सांगितल्यावर मात्र त्यावर काही न बोलता उद्धव गप्प बसला. कारण भगवंताची आज्ञा त्याला शिरोधार्य होती. उद्धवा तुझ्या ठायी पूर्ण ज्ञान आहेच. त्यात तू माझे भजनही करतो आहेस. त्यामुळे तुझ्या चरणस्पर्शाने बद्रिकाश्र्रम पावन होईल. भगवंताचे हे बोलणे ऐकून उद्धवाच्या लक्षात आले की, आता भगवंतांनी आपल्याला निरोप द्यायची तयारी केली असून त्यादृष्टीने ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. भगवंतांचे निरोपाचे बोलणे ऐकून त्यांच्या विरहाच्या कल्पनेने उद्धवाला रडू आले पण आता त्याचा नाईलाज झाला होता. म्हणून तो धावत गेला आणि त्याने भगवंतांचे पाय पकडले आणि म्हणाला, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बद्रिकाश्रमाकडे जात आहे. उद्धवाचे बोलणे ऐकून देवांना परमसंतोष झाला. ते म्हणाले, अतीव दु:खदायक असा ब्रह्मशाप चुकवण्यासाठी मी तुला तीर्थाटनाला पाठवत आहे.अन्यथा तू ब्रह्मज्ञानी असल्याने तुला तीर्थाटनाला जाण्याची गरज नव्हती.
क्रमश: